अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आता राजकारण पेटलं आहे. सुशांतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलीस करत असताना या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून व्हावी अशी मागणी करत मुंबई पोलीस आणि राज्य सरकारवर विरोधक निशाणा साधत आहेत. अशा वेळी महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ‘मुंबई सुरक्षित नाही’ असं म्हणतं सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर ट्विट केलं आहे. या ट्विटला अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी चांगलंच सुनावलं आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबईविषयी एक वक्तव्य केलं होतं. ‘सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास ज्या प्रकारे सुरू आहे, त्यावरून मला असं वाटतं की मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणं अजिबात सुरक्षित नाही’, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं होतं. दरम्यान, अमृता फडणवीस यांच्या ट्विटवर अनेकांनी ट्विटरवर संताप व्यक्त केला आहे.
रेणुका शहाणे यांनी अमृता फडणवीस यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री काळातील एका घटनेची आठवण करून दिली आहे. शहाणे विचारतात की, फडणवीस सरकारच्या काळात एलफिस्टन पूल कोसळला यामध्ये असंख्य लोकांचा मृत्यू झाला. तेव्हा अमृता फडणवीस यांना मुंबईमध्ये माणुसकी नाहीये वगैरे किंवा मुंबईत असुरक्षित वाटलं नाही का? असं ट्विट केलं आहे.
‘सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला राजकीय मुद्दा करु नका. तसंच मुंबई आणि येथील नागरिकांसाठी कोणताही अपशब्द वापरू नका. जर तुमच्याकडे क्षमता आणि ताकद असेल तर त्याचा वापर पोलिसांची मदत करण्यासाठी करा. जर आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते तर असं वक्तव्य केलं असतं का?’, असा सवाल रेणुका शहाणेंनी विचारला आहे.