मुंबई : रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केले आहे. रायगड पोलिसांनी आज सकाळी मुंबई पोलिसांसह अर्णब गोस्वामी यांच्या घरी जात त्यांनी अटक केली. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
अन्वय नाईक यांनी अलिबागजवळील कावीर इथं आपल्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या आई कुमुद नाईक यांचाही घरात मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी गोस्वामी यांच्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर दुसरीकडे पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रं नसतानाही ही कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून करण्यात आला आहे.
#WATCH Republic TV Editor Arnab Goswami detained and taken in a police van by Mumbai Police, earlier today pic.twitter.com/ytYAnpauG0
— ANI (@ANI) November 4, 2020
गोस्वामी यांनी मुंबई पोलिसांनी आपल्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. अर्णब गोस्वांमी यांनी १० पोलीस कर्मचारी घरात घुसले आणि घराबाहेर येण्यासाठी जबरदस्ती करत धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. त्यांना चौकशीसाठी अलिबागला नेण्यात येणार आहे.
दरम्यान, 5 मे 2018 रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील कावीर गावातील राहत्या घरी आत्महत्या केली. तिथेच त्यांच्या आई कुमूद नाईक यांचाही मृतदेह आढळला होता. अन्वय नाईक हे पेशाने वास्तुविशारद होते. कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला आणि त्यांना आत्महत्येला जबाबदार धरलं होतं. त्यानंतर अन्वय नाईक यांच्या पत्नीनं अलिबाग पोलीस ठाण्यात अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला होता.