सोलापूर – औरंगाबादच्या नामांतरावरुन राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला. औरंगाबादच्या नामांतराबाबत शिवसेनेची भूमिका आग्रही आणि विषय भावनिक आहे, मात्र रोजगाराचा प्रश्न महत्त्वाचा असल्याचं रोहित पवार म्हणाले. थकित वीज बिलाच्या कारवाईबाबतही रोहित पवारांनी ठाकरे सरकारला घरचा आहेर दिला.
“औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. मी माझं व्यक्तिगत मत अनेक वेळा मांडलं आहे. एखाद्या शहराचं, गावाचं नाव बदलायचं असेल, तर त्या गावातील लोकांनाही विश्वासात घ्यावं. लोकशाही पद्धतीने किंवा अन्य माध्यमातून त्यांचं मत जाणून घेतलं, तर जो काय निकाल येईल, त्या निकालाला ताकद देण्याची जबाबदारी सरकारची असेल” असं रोहित पवार म्हणाले.
“तरुणांचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्या रोजगाराचा प्रश्न महत्वाचा आहे. त्यामुळे त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देणे गरजेचं आहे. महाविकास आघाडी ही कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवर काम करते. त्यामुळे अनेक प्रश्नांवर काम करायचे आहे” असे रोहित पवार म्हणाले.