पुणे – ‘अजितदादा पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत येणार आहेत. म्हणूनच देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईन, असं म्हणत असतात. या सरकारचा पाठिंबा काँग्रेस कधी काढेल हे सांगता येत नाही. एकदा काँग्रेसने पाठिंबा काढला की अजितदादा आमच्याकडे आलेच म्हणून समजा,’ असा दावा करत आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राजकारण खळबळ उडवून दिली आहे.
रामदास आठवले यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर चौफेर फटकेबाजी केली. ‘परवा मुख्यमंत्री मला म्हणाले की, आठवलेजी आता तुम्ही इकडे या. पण मी म्हणालो तुम्हीच इकडे या,’ असं म्हणत आठवले यांनी पत्रकार परिषदेत चांगलाच हशा पिकवला.
तसेच रामदास आठवले यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून देखील भाष्य केले. ‘राज्य सरकारला सुप्रीम कोर्टात बाजू मांडता आली नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी सर्वात आधी माझ्या पक्षाने केली. मराठा समाजाची जी मागणी आहे तिला आमचा पाठिंबा आहे. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे,’ अशी भूमिका मराठा आरक्षणप्रश्नी रामदास आठवले यांनी घेतली.