मुंबई : रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडू लागल्या आहेत. मनुष्यवधास जबाबदार असणाऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणारा सत्ताधारी पक्ष जगातले आठवे आश्चर्य, असे म्हणत आता या प्रकरणावरून शिवसेनेने भाजपला टोला लगावला आहे. सामनाच्या अग्रलेखातून या प्रकरणावर शिवसेनेने भाष्य केले आहे.
गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी वगैरे नेत्यांशी मतभेद असू शकतात. म्हणून ‘एकेरी’वर जाऊन त्यांच्यावर चिखलफेक करणे आम्हाला मान्य नाही. ही ‘ट्रम्प’ संस्कृती हिंदुस्थानात कोणी रुजवत असेल तर त्यांनी अमेरिकेत सुरू झालेल्या अराजकाकडे डोळसपणे पाहायला हवे. तसे अराजक कोणाला हिंदुस्थानात हवे आहे काय? राजकारणात देशाचे वाटोळे होऊ नये, देशाचे स्वातंत्र्य, लोकशाहीचा सदोष मनुष्यवध घडू नये हीच आमची प्रामाणिक इच्छा. मनुष्यवधास जबाबदार असणाऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणारा सत्ताधारी पक्ष म्हणजे जगातले आठवे आश्चर्यच मानावे लागेल. नक्कीच त्यांच्या रक्तात आणि मेंदूत काहीतरी गडबड आहे, असे म्हणत शिवसेनेने भाजपवर हल्ला चढवला आहे.
अग्रलेखात म्हटले आहे की, महाराष्ट्रात 2018 साली एका माय-लेकरांनी आत्महत्या केली. तत्कालीन सरकारने ते प्रकरण दडपले. पोलिसांनी या प्रकरणातील एका आरोपीस पकडले व त्याच्या जामिनावर न्यायालयात सुनावणी सुरू असताना भाजपचे पुढारी वेडेखुळेच बनले. ते म्हणतात, जोपर्यंत सदोष मनुष्यवधातले ‘महात्मा’ सुटत नाहीत तोपर्यंत आम्ही सगळे दंडास काळय़ा फिती लावून काम करू. हा तर मानसिक विकलांगतेचा तमाशाच आहे.
अमेरिकेचे सध्याचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी तुलना करत देखील शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे. ट्रम्प यांचे जे वर्तन आहे ते कायद्यास व अमेरिकेसारख्या राष्ट्राच्या प्रतिष्ठेस धरून नाही. तशीच अप्रतिष्ठा महाराष्ट्रातील विरोधी पक्षाकडून कायद्याच्या बाबतीत सुरू असल्याची टीका शिवसेनेने केली आहे.
मनुष्यवधाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या संशयित आरोपीचा निकाल रस्त्यावर उतरून कसा काय होऊ शकतो? असा सवाल देखील शिवसेनेने विचारला आहे. पंतप्रधान, राष्ट्रपती, लष्करप्रमुख, राज्यपाल अशा पदांवरील व्यक्तींचा एकेरी आणि ‘अरे-तुरे’च्या भाषेत जाहीर उद्धार केलेला भाजपला चालणार असेल तर त्यांनी तसे सांगावे. म्हणजे त्यांच्या दंडावरील काळय़ा पट्टय़ांचे आम्हीही स्वागत करू, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.