मुंबई : देशासह राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. उपचारा अभावी रुग्णांचे मृत्यू होत असल्याचे देखील समोर आले आहे. पुण्यात पत्रकार पांडुरंग रायकर आणि पुण्याचे माजी महापौर दत्ता एकबोटे यांना वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. आता याविषयी सामना अग्रलेखातून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यावर दबाव आणून दहशतीचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप, शिवसेनेने सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून विरोधकांवर केला आहे.
कोरोना काळात पुरेशा आरोग्य व्यवस्था नसण्याला फडणवीस सरकार जबाबदार असल्याचा आरोप, अग्रलेखात केला आहे. अग्रलेखात म्हटले आहे की, वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी भरती आणि सुविधा योग्य निर्माण केल्या असत्या तर आजची परिस्थिती थोडीफार नियंत्रणात आली असती. मागच्या 5 वर्षात फडणवीस सरकारने आरोग्यविषयक काम केले असते तर आज तात्पुरत्या जम्बो सुविधा उभारण्याची गरज कमी लागली असती.
अग्रलेखात म्हटले आहे की, विरोधी पक्षांच्या टीकेचा आरोपांचा मुख्य भर जम्बो कोव्हिड केंद्रावर आहे. ही केंद्रे धडपणे चालू द्यायची नाहीत, त्यात काम करणाऱ्या डॉक्टर नर्स यांच्यावर दबाव आणून दहशत निर्माण करायची असे राजकीय धोरण राज्याच्या गंभीर स्थितीस धोकादायक आहे. पुण्यातील राजकारण्यांनी याचे भान ठेवले तर पांडुरंग रायकर, दत्ता एकबोटे यांना जे भोगावे लागले ते इतरांच्या नशिबी येणार नाही.