मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात मातोश्री किंवा वर्षा निवासस्थानावरुन राज्याचा कारभार पाहात होते. संकट काळातही मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत अशी टीका सातत्यानं त्यांच्यावर होत असते.
मागील आठवड्यात राज्यातील विविध भागात अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं. अशा संकटातही मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत, अशी टीका विरोधकांकडून सुरु होती. त्यानंतर अखेर मुख्यमंत्र्यांनी रविवारी सोलापूर तर आज उस्मानाबाद जिल्ह्यातील नुकसानाची पाहणी केली. हाच धागा पकडत संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज उस्मानाबाद जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यावरुन मनसे पदाधिकारी संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. ‘मुख्यमंत्री घराबाहेर पडले ही चांगली गोष्ट आहे, ते बाहेर पडले म्हणजे कोरोना संपला असं म्हणावं लागेल’, अशी खोचक टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे.
‘मुख्यमंत्री इतके दिवस घरी बसून होते. आता बाहेर पडले आहेत. मुंबईत आजपासून सर्वसामान्य महिलांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. पण हे नियोजन शून्य आहे. कार्यालयाची वेळ सकाळची आणि प्रवासाची मुभा ११ नंतर. याचा उपयोग काय?’ असा सवाल संदिप देशपांडे यांनी राज्य सरकारला पर्यायानं मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री घराबाहेर पडत आहेत तर आता सर्वांना रेल्वे प्रवासाची मुभा द्या, अशी मागणीही देशपांडे यांनी केली आहे.
Read also :
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारवर दबावही आनु- देवेंद्र फडणवीसhttps://t.co/lT4ZjKm9g9#DevendraFadanvis #BJP @Dev_Fadnavis
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 21, 2020