पुणे: मागील काही दिवसापासून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मातोश्री, वर्षा आणि सिल्व्हर ओक या बंगल्यावरील भेटी वाढल्याचं दिसत आहे. राऊतांच्या या भेटीगाठींमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात काही अनबिन असल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात पवार नाराज असल्याची चर्चा जोर धरु लागली. हाच धागा पकडत भाजपच्या नेत्या आणि प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. महाविकास आघाडीत किती आलबेल आहे हे राऊत यांच्या चेहऱ्यावरुच बघायला मिळत अशल्याची खोचक टीका वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलीय.
“संजय राऊतांच्या अस्वस्थेमुळे महाविकास आघाडीत किती आलबेलं आहे हे त्यांच्या येरझाऱ्या करण्यावरून दिसतचं आहे. एकच कोडं, कुणीही हरामखोर म्हणलेलं नसताना, ‘मी हरामखोर नाही’, हे कशाला सिद्ध करावं लागतंय? संजयजी, माझं एकच आवाहन आहे की, तुम्ही सहा आठवड्याचं अधिवेशन बोलवावं आणि मगच विरोधकांच्या भूमिकेवर आपलं मत व्यक्त करावं”, असं ट्वीट करुन वाघ यांनी संजय राऊत यांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय. तसंच पावसाळी अधिवेशनावरुन थेट आव्हानही दिलं आहे.
संजयजींच्या अस्वस्थेमुळे महाविकासआघाडीत किती आलबेलं आहे हे त्यांच्या येरझाऱ्यांवरून दिसतयं
एकच कोडं कुणीही हरामखोर म्हणलेलं नसताना ‘मी हरामखोर नाही’हे का सिद्ध करावं लागतंय?संजयजी माझंआवाहन की तुम्ही ६आठवड्याचं अधिवेशन बोलवावं आणि मगच विरोधकांच्या भूमिकेवर आपलं मत व्यक्त करावं pic.twitter.com/fsP0R2WmAy
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 29, 2021
महाविकास आघाडी सरकार ५ वर्षे टिकणारच, राऊतांचा दावा
शरद पवार नाराज या चर्चेला अर्थ नाही. तिन्ही पक्षांचं व्यवस्थित सुरु आहे. केव्हातरी पूर्णविराम द्यावा लागेल. सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. मनुष्य म्हटल्यावर मतभेद असू शकतात पण नाराज कुणीच नाही, असं राऊत यांनी आवर्जुन सांगितलं. अहमदाबादमध्ये कुणालाही भेटल्याचा इन्कार शरद पवार यांनी केलाय. मोदी-ठाकरे यांच्यात चर्चा झाली असली तरी वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. या दोन्ही बैठकांमध्ये काहीही राजकारण नसल्याचा दावाही राऊत यांनी यावेळी केलीय.