मुंबई – शिवसेनेते नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बाजवले आहेत. ईडीच्या या नोटीसवर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. “तुम्ही नोटीस पाठवा किंवा आम्हाला घरी येवून अटक करुन घेऊन जा. नोटीसला उत्तर दिलं जाईल. पण बायकांच्या पदराआड लढाई करण्याची खेळी ही तुमच्यावर उलटल्याशिवायर राहणार नाही”, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
कालच मी देवेंद्र फडणवीसांचं ऐतिहासिक विधान ऐकलं, काही केलं नसेल तर घाबरायचं कशाला? नोटीस म्हणजे काय ब्रह्मवाक्य आहे का? मी परत सांगतो, आमच्यातील कुणी काहीही केलं नाही. नोटीस येऊद्या किंवा नाही येऊ द्या. आम्ही घाबरत नाही, तुम्ही घाबरायला हवं, असं संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना ठणकावलं आहे.
“महाविकास आघाडी सरकार पडणार नाही. मग या सरकारचे खंदे समर्थक आणि प्रवर्तक कोण आहेत त्यांना त्यांच्या कुटुंबियांना त्रास द्यायचा. जर हे करणार असाल तर खुशाल करा. ईडी, सीबीआयने ते करावं किंवा आमच्याविरोधात बाहेर कुणी दहशतवादी गँग असेल त्यांनी ते करावं. आम्ही हटणार नाहीत. या सरकारचा बालही बाका होणार नाही”, अशी भूमिका त्यांनी मांडली.