व्हॉट्सअॅपवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आक्षेपार्ह व्यंगचित्र शेअर केल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना अटक केली होती. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. आता या घटनेविषयी संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संजय राऊत म्हणाले की, हे कायद्याचेच राज्य! महाराष्ट्र कायद्याचे राज्य आहे. कायदा हातात घेणारे कोणीही असले तरी त्याची गय केली जाणार नाही, हेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धोरण आहे. मुंबईत काल एका माजी नौदल अधिकाऱ्यावर हल्ला झाला. त्या अधिकाऱ्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर प्रसारित केलेले व्यंगचित्र बदनामीकारक असले तरी त्याच्यावर झालेला हल्ला म्हणजे शिवसैनिकांची संतप्त, तितकीच उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. तरीही हल्लेखोरांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) September 12, 2020
विरोधी पक्षाने या घटनेचे राजकीय भांडवल करावे, हे दुर्दैव आहे. संयम दोन्ही बाजूंनी पाळला गेला पाहिजे. पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री या घटनात्मक पदांबाबत टोकाची टीका करताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार झाला, तर लोकांच्या संयमाचा बांध तुटतो. म्हणून सगळ्यांनीच जबाबदारीने एकमेकांचा आदर ठेवून वागण्याची ही वेळ आहे. समाजात अशांतता व तणाव निर्माण होऊ न देणे हे सत्ताधाऱ्यांइतकेच विरोधकांचेही कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, जखमी मदन शर्मा यांनी काल पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी जखमी असून तणावाखाली आहे. माझ्यासोबत जे काही घडलं ते अत्यंत दुःखद आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जर तुम्ही कायदा-सुव्यवस्था सांभाळू शकत नसाल तर राजीनामा द्यावा.