कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात पार पडणार आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करणार आहेत. यावेळी शिवसेनेचे मोजकेच पदाधिकारी, आमदार आणि खासदार उपस्थित असतील.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आजचा दसरा मेळाव्याबाबत भाष्य केले आहे. आजच्या मेळाव्याचे स्वरूप कसे असेल याबाबत त्यांनी माहिती दिली असून यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीकेबाजी केली आहे.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेळावा घेत आहात, जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा अशी टीका विरोधकांनी केली आहे. त्याला जोरदार प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी जनाची आणि मनाची बाळगूनच दसरा मेळावा शिवतीर्थावर नाही तर सभागृहात घेत आहोत असे म्हटले आहे. बिहार निवडणूक प्रचारात भाजप ५० हजार लाखाचे मेळावे घेत आहे त्याचं काय? असा सवालही यावेळी संजय राऊत यांनी विचारला
‘जनाची आणि मनाची कोणी कोणाची काढायची? विरोधकांची ही टीका सरसंघचालक मोहन भागवत यांनाही लागू पडते का? कारण सरसंघचालकांनीदेखील आज मेळावा घेतला. आम्ही त्यांचा आदर करतो,’ असं राऊत म्हणाले. आम्हाला जनाची, मनाची आहे म्हणूनच शिवतीर्थावर होणारा भव्य मेळावा सावरकर सभागृहात घेत आहोत. पण निवडणूक जिंकण्यासाठी हजारोंची गर्दी असलेल्या सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये घेत आहेत.
शिवसेनेच्या ऐतिहासिक दसरा मेळाव्यावर टीका करत असाल, तर मोदींच्या सभांचं काय? तिथे जनाची, मनाची, तनाची, धनाची बाळगली जात नाही, अशा तिखट शब्दांत राऊत यांनी भाजप नेत्यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं.