मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर, तसेच कार्यालये मिळून १० ठिकाणी सीबीआयने आज सकाळी धाडी टाकून, त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी, सीबीआयने अचानक केलेल्या या संपूर्ण कारवाईवर टीका करताना, एक ट्विट केले आहे. तसेच या छापेमारीवर सवाल देखील उठवले आहेत.
‘’कुछ तो गडबड है. मा. उच्च न्यायालयाने फक्त प्राथमिक चौकशीचे आदेश देत अहवाल सादर करा, असे सीबीआयला सांगितले होते. अनिल देशमुख यांच्या निवासस्थानावर धाडी, एफआयआर वगैरे हा अतिरेक आहे. हा सर्व प्रकार न्याय आणि तर्कसंगत दिसत नाही. कुछ तो गडबड जरुर है, असे ट्विटमध्ये लिहून संजय राऊत यांनी या संपूर्ण कारवाईवरच शंका घेतली आहे.
कुछ तो गडबड है…
मा.उच्च न्यायालयाने फक्त प्राथमिक चौकशीचे आदेश देत अहवाल सादर करा असे सीबीआयला सांगीतले होते.
अनिल देशमुखावर धाडी. एफ.आय. आर..वगैरे अतिरेक आहे. हा सर्व प्रकार न्याय व तर्कसंगत दिसत नाही.दया..कुछ तो गडबड जरूर है.— Sanjay Raut (@rautsanjay61) April 24, 2021
दरम्यान, अनिल देशमुख यांच्या निवासस्थानांवर आज सकाळपासून सुरू झालेले धाडसत्र अद्याप सुरू आहे. देशमुख राहत असलेल्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यातही सीबीआयने छापे मारले असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. तसेच ज्ञानेश्वरी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयने नेल्याचं सांगण्यात येत आहे.
१०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची, सीबीआयने तब्ब्ल ११ तास चौकशी केलीय असून, त्यानंतर सीबीआयने एक अहवाल तयार केला आहे. हा अहवाल सीबीआयने अद्याप कोर्टात सादर केला नाही. मात्र, अहवाल सादर करण्यापूर्वीच देशमुखांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.