दिल्ली – शरद पवार केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत पोहोचले होते. पुरंदर विमानतळाच्या जमीन अधीग्रहणासंदर्भात यावेळी चर्चा झाली. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पत्राबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “ज्यांनी पत्राचा हवाला दिला आहे त्यांनी ते थोडं नीट वाचलं असतं तर त्यांचा वेळ वाचला असता. कायद्यातील सुधारणांसंदर्भात पत्र लिहिलं होतं यामध्ये कोणतंही दुमत नाही. पण आज जे तीन नवे कृषी विधेयक आणले आहेत त्यात याचा उल्लेख दिसत नाही”.
शरद पवार यांनी यावेळी विषय भरकटवण्यासाठी हे केलं जात असल्याचाही आरोप केला. याला जास्त महत्व देऊ नका असंही ते म्हणाले आहेत. शरद पवारांनी आपण शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचं सांगत अधिक बोलण टाळलं.
तसेच शेतकरी आंदोलनाबद्दल मी आत काही बोलणार नाही असे सांगून देखील पत्रकारांनी वारंवार पत्र आणि शेतकरी आंदोलनाबद्दल प्रश्न विचारल्याने शरद पवार संतापले आणि पत्रकार परिषद संपवून निघून गेले. मुद्दा काय आणि तुम्ह विचारताय काय असे म्हणत शरद पवार पत्रकार परिषद सोडून निघून गेले.
दरम्यान, युपीए सरकारच्या काळात केंद्रीय कृषीमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळत असताना शरद पवार यांनी कृषी कायद्यात मोठ्या बदलाची गरज व्यक्त करत अनेक राज्यांना पत्र लिहिलं होतं. सध्या सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे पत्र पुन्हा एकदा व्हायरल झालं असून भाजपा पाठिंबा देण्यावरुन शरद पवारांवर निशाणा साधत आहे.