मुंबई : केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकरी आंदोलन करत आहे. विरोधी पक्षांकडून देखील हे कायदे मागे घेण्याची मागणी केली जात आहे. काही दिवसांपुर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काही नेत्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. आता पुन्हा एकदा शरद पवार शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरणार आहेत.
शेतकरी आंदोलनासंदर्भात देशातील इतर पक्षांशी बोलणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. ते काल मुंबईत बोलत होते.
शरद पवार म्हणाले की, दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनासंदर्भात मी इतर पक्षांसोबत बोलणार आहे. यापूर्वी आम्ही पाच ते सहा राजकीय पक्षांनी एकत्र येऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. आम्ही केंद्र सरकारला कृषी कायदे मागे घेण्यासंदर्भात सांगितलेच आहे.
दरम्यान, मागील 18 दिवसांपासून शेतकरी कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. केंद्र सरकारकडून चर्चेसाठी आपण तयार असल्याचे सांगितले जात आहे. तर शेतकऱ्यांकडून कायदे मागे घेण्याची मागणी केली जात आहे.