इंदापूर: उजनी पाण्यावरून आता चांगलाच संघर्ष पेटताना दिसत आहे. सोलापूर मधील प्रस्थपित नेते, आमदार, खासदार, सामाजिक संघटना यांनी जोरदार विरोध आणि आंदोलनाची भूमिका घेतल्यामुळे उजनी धरणातून इंदापूर तालुक्यातील २२ गावांना पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रद्द केला आहे. पाच टीएमसी पाण्याचा निर्णय रद्द झाल्याने आता इंदापुर तालुक्यातील शेतकरी आणि राजकीय नेते मंडळींनी आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. राज्यमंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी आपली राजकीय शक्ती आणि पद-प्रतिष्ठा या निर्णयासाठी पणाला लावली होती.
मागील आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रासायनिक खतांच्या किंमतीवरून दिल्लीत फोन केल्याने रासायनिक खतांच्या किंमती कमी झाल्या. तसाच फोन आता इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जलसंपदा मंत्री, आपले विश्वासू जयंतराव पाटील यांना करावा आणि आम्हाला आमच्या हक्काचे पाच टीएमसी पाणी मिळवून द्यावे अशी आर्त हाक राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. शशिकांत तरंगे NCP Youth Congress Vice President Dr. Shashikant Tarange यांनी दिली आहे.
डॉ. तरंगे म्हणाले कि, केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना देखील शरद पवार साहेबांनी दिल्लीत एक फोन केल्यामुळे खतांच्या किंमती कमी झाल्या आहेत. राज्यात तर आपल्याच विचारांचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे तुमच्या अशाच एका फोनची इंदापूर तालुक्याला नितांत गरज आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून इंदापूर तालुका कायम आपल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. आगामी काळात देखील अश्याच पद्धतीने उभा राहणार आहे अशी ग्वाही देखील तरंगे यांनी दिली आहे.