सांगली – किसान आत्मनिर्भर यात्रेची आज सांगलीतून सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी एक टीकास्त्र सोडले आहे. “शेतकऱ्यांचं नेतृत्व करतो म्हणणारे काही नेते भाषण करत सुटलेत. हा प्रकारे म्हणजे मेंढ्यांच्या कळपाचं नेतृत्व लांडग्यांनी करण्यासारखं आहे”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले. पण टीका करत असताना त्यांनी कोणाचंही नाव घेतलेलं नसल्यानं हा वार नेमका कुणावर, अशा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शेतकऱ्यांच्या पायातील बेड्या तोडण्यासाठी हा कृषी कायदा आणला आहे. आम्ही शेतकऱ्यांचे मुलं आहोत. पण काही लोक शेतकऱ्यांचं नेतृत्व करतो असं सांगत भाषण करत सुटले आहेत. मेंढ्यांच्या कळपाचं नेतृत्व लांडग्यांनी करावं, असा हा प्रकार असल्याचीही टीका गोपीचंद पडळकरांनी केली आहे.
राज्य सरकारला माझा एक सवाल आहे. कोरोना काळात गहूपासून व्हेंटिलेटरपर्यंत सर्व काही केंद्र सरकारने दिलेलं आहे. राज्य सरकारने 12 बलुतेदारांना काय दिले ते सांगावं, कोणतेही काम करताना राज्य सरकारमधील नेते म्हणतात, कोरोना आहे. मात्र काही पोलीस अधिकारी यांच्या बदल्या करण्यासाठी लगेच मीटिंग घेतल्या जातात आणि काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याही केल्या जातात. काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या नाहीत, कारण अजून त्यांचा पैशाचा व्यवहार झाला नसल्याचा घणाघाती आरोपही त्यांनी ठाकरे सरकारवर केला आहे.