मुंबई – कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युतीचे संकेत मिळाले आहे. मागील काही दिवसांमध्ये ऐकू आलेल्या राजकीय विधानांवरून तसे संकेत मिळत आहेत. मात्र, याबाबत अद्याप स्पष्टीकरण मिळाले नसून चर्चाना उधाण आले आहे.
राज्य सरकारप्रमाणे या निवडणुकीत महाविकास आघाडी होणार असे दावे शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अनेकदा केले गेले आहे. दुसरीकडे भाजप मनसेची युती होणार अशीही चर्चा शहरात रंगली आहे. ही चर्चा सुरु असतानाच आता शहरात पुन्हा भाजप-सेना नेत्यांची जवळीक वाढताना दिसत आहे. 26 जानेवारी रोजी शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी निमंत्रणाची वाट न बघता भाजपच्या कार्यक्रमात हजेरी लावून सर्वाना बुचकळ्यात टाकले. यावेळी त्यांनी केलेल्या छोटेखानी भाषणाची प्रचंड चर्चा सुरु आहे. सोशल डिस्टसिंग ठेवा. मात्र मनात डिस्टन्स ठेवू नका असे आवाहन श्रीकांत शिंदे यांनी भाजप नेत्यांना केले होते.
विशष म्हणजे राज्यात शिवसेनेशी राजकीय वैर असूनही भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी श्रीकांत शिंदे यांच्या या वक्तव्याचे समर्थन केले. ही चांगली गोष्ट आहे. मनात डिस्टन्स राहिला नाही तर विकास कामे होतील. शहर चांगले होऊ शकते. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहिले असताना शिवसेना आणि भाजप नेत्यांमधील जवळीक वाढत असल्याचे दिसत आहे.
भाजपच्या कार्यक्रमात अचानक पोहोचलेले श्रीकांत शिंदे पोहोचले, म्हणाले, ‘मला बोलावले नसले तरी मी आलो. सोशल डिस्टन्सिंग किती जरी असली तरी एकमेकांमध्ये डिस्टन्स ठेवू नका, असं आवाहन त्यांनी भाजपला केले. भाजपने कल्याणच्या पत्रीपुलाजवळ नवीन पूल आणि पोहोच रस्त्याला जोडणाऱ्या चौकाला नामकरण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम स्थानिक भाजप नगरसेविका रेखा चौधरी यांनी आयोजित केला होता. या चौकाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नाव देण्यात आले. भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. मात्र कार्यक्रम सुरू असताना अचानक शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले. त्यांना पाहून भाजपचे सर्व कार्यकर्ते बुचकाळ्यात पडले.