सुशांत सिंह राजपूत प्रकरण असो किंवा इतर कोणतेही आरोप असोत हिंदी वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी हे वारंवार शिवसेना सरकारला लक्ष करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून गोस्वामी यांनी थेट उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना लक्ष केल्याचे दिसून आले होते. त्यानंतर आता शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे एक निवेदन देऊन गोस्वामी यांच्या वक्तव्यांवर कायदेशीरपणे कारवाई करण्याची मागणी केली आहे.
काय म्हणालेत सावंत आपल्या निवेदनामध्ये
पत्रकार अर्णब गोस्वामी हे सतत बेजबाबदार बातम्या प्रसारित करत आहेत.
कुठल्याही पुराव्याशिवाय राज्यातील कॅबिनेट मंत्र्यांवर बेछूट आरोप लावण्यापर्यंत त्यांच्या चॅनेलची मजल गेली आहे.
बातम्या प्रसारित करताना यापूर्वीही त्यांनी राजकीय नेत्यांवर खास करुन विरोधी पक्षांच्या नेत्यांवर अश्लाध्य शब्दात आरोप करुन चारित्र्यहनन केले होते.
यापूर्वीही त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.
एका मृत महिलेबाबत आरोप करताना पत्रकारितेतील सर्व नीतीमत्ता त्यांनी ओलांडली आहे.
त्या मृत महिलेची विटंबना आणि चारित्र्यहननाचे पातक त्यांच्याकडून घडले आहे.
सदर महिलेच्या पालकांनी अशा अशोभनीय बातम्यांबद्दल आक्षेप घेतला आहे.
अर्णब गोस्वामी अत्यंत वाईट पद्धतीने प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियमांचे उल्लंघन करत आहेत.
अर्णब गोस्वामी समाजात तेढ निर्माण करुन लोकांना चिथावणी देण्याचे काम करत आहेत
त्यामुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण होईल
अशी भीती खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केली आहे.
माननीय नामदार श्री. @AnilDeshmukhNCP जी, गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य यांची भेट घेऊन @republic इंग्रजी आणि @Republic_Bharat या हिंदी वाहिनीचे मुख्य संपादक श्री. अर्णब गोस्वामी यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. @OfficeofUT @AUThackeray pic.twitter.com/WsHT5a1fcq
— Arvind Sawant (@AGSawant) August 18, 2020
त्याचसोबत एखाद्या गुन्ह्या संदर्भात कुठलाही पुरावा नसताना बातम्या प्रसिद्ध करणे, त्या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या यंत्रणेच्या कामात व्यत्यय आणू शकतो. गुन्हेगाराला सुरक्षितस्थळी पळण्यासाठी मदत होते. जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीवर अत्यंत घृणास्पदरित्या बेछूट आरोप ही वाहिनी करत आहे. पोलीस खात्याचाही वेळोवेळी अपमान केलेला आहे. पोलीस खात्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचवला आहे असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे. गृहखात्याने यावर लक्ष घालून तातडीने त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी खासदार अरविंद सावंत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना केली.