मुंबई : एअर इंडियामध्ये मागीलवर्षी ऑगस्ट महिन्यात पर्सर, हवाई सुंदरी आदी पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. जेट, गोएअर, इंडिगो यासारख्या विमान कंपन्यांमधील अनुभवी व्यक्तींना त्यात निवडण्यात आले. त्यांची वैद्यकीय तपासणी तसेच हैदराबाद येथे प्रशिक्षण देखील पूर्ण झाले.मात्र त्यानंतर एअर इंडियाने मुंबईतील भरतीला स्थगिती दिल्याने शिवसेनेचे खासदार आक्रमक झाले आहेत.
एअर इंडियाने फक्त मुंबईतील भरती प्रक्रिया अचानक स्थगित केली. त्यामुळे मुंबई-महाराष्ट्रातील उमेदवारांवर अन्याय झाल्याचा मुद्दा खासदार गजानन कीर्तीकर यांनी फेब्रुवारीमधील अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उपस्थित केला होता. त्यांना लगेच सेवेत घेण्याची मागणीही त्यांनी केली होती. त्यावर या सर्व उमेदवारांना एअर इंडियाच्या सेवेत लवकरच समाविष्ठ केले जाईल, असे आश्वासन केंद्रीय हवाई वाहतूक खात्याचे मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दिले होते.
मात्र आता या आश्वासनाला सात महिने झाल्यामुळे त्यासंदर्भात आठवण करून देण्यासाठी कीर्तीकर व दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी पुन्हा पुरी यांची भेट घेतली. सध्या एअर इंडियाच्या सेवेचा विस्तार सुरु असल्याने या अनुभवी उमेदवारांना एअर इंडियाने तत्काळ सेवेत समाविष्ठ करून घ्यावे, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली. या निवेदनावर शिवसेनेच्या सर्व खासदारांच्या स्वाक्षऱ्या होत्या.तसेच याबाबत शिवसेना खासदार गजानन कीर्तीकर व अरविंद सावंत यांनी निषेध नोंदविला आणि शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
Read Also
भाजप कार्यकर्त्यांनी रोखला आरोग्यमंत्र्यांचा ताफा
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 26, 2020