मुंबई : राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बिहार विधानसभा निवडणुकीसाठी युती होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी तसे संकेत दिले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात रविवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये दीर्घकाळ चर्चा सुरु होती. यामध्ये बिहार निवडणुकीविषयी चर्चा झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांत मतदान पार पडणार आहे. यानंतर 10 नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. बिहार निवडणुकीसाठी भाजपने नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाशी युती केली आहे.
काँग्रेसने लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी युती केली आहे. त्यामुळे मुख्य लढत ही या दोन आघाड्यांमध्येच असेल. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससारख्या लहान पक्षांमुळे प्रतिस्पर्धी उमेदवाराची मते कापली गेल्यास काँग्रेस-आरजेडी आघाडीला काहीप्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे.
यावेळी तटकरे यांनी आरेतील मेट्रोची कारशेड कांजूरला हलवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचेही समर्थन केले. आरे संदर्भातील मुख्यमंत्र्यांचा निर्णय हा योग्यच आहे. यापूर्वीच्या सरकारकडून ‘रात्रीस खेळ चाले’ या पद्धतीने रात्रीच झाडे तोडली.
परंतु, उद्धव ठाकरे यांनी पर्यावरणाचे संतुलन राखत राज्य सरकारची जागा विनामोबदला मेट्रोच्या कारशेडसाठी उपलब्ध करुन दिली आहे. पर्यावरण राखण्याची जबाबदारी येत असते त्यावेळी तोट्याचा विचार केला जाऊ नये. देवेंद्र फडणवीस हे केवळ विरोधाला विरोध म्हणून या निर्णयावर टीका करत असल्याचे सुनील तटकरे यांनी सांगितले.
यासंदर्भात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही. मात्र, बिहारमध्ये एकत्र प्रचार करण्याची संधी मिळाली तर नक्कीच आनंद वाटेल. राज्यामध्ये एकत्र आहोत त्यामुळे बिहारसारख्या निवडणुकीत आम्ही एकत्र आलो तर चांगलेच होईल, असे सुनील तटकरे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
Read Also ;
MPSC परीक्षा रद्द करताना सरकारने मराठ्यांचा विचार केला पण बाकीच्या जनतेचं काय? प्रकाश आंबेडकरांचा सवाल https://t.co/dmbBpz64xS @Prksh_Ambedkar
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 12, 2020