भाजपचे खासदार ना शेतकरी आंदोलनावर बोलत आहेत ना चीनच्या घुसखोरीवर बोलत आहेत. पण आमचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अर्थात लष्करप्रमुख नेपाळला चीनपासून सावध राहण्याचा सल्ला देत आहेत. मात्र, सावध राहण्याची खरी गरज आम्हाला म्हणजेच हिंदुस्थानला आहे, अशा शब्दांत शिवसेनेनं लष्करप्रमुख बिपीन रावत यांचे कान टोचले आहेत.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’तून शिवसेनेनं लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी नेपाळबाबत घेतलेल्या भूमिकेवर परखड मत मांडलं आहे. नेपाळ हातचा गेलाच आहे. लडाखमध्ये चिनी घुसले आहेत. त्यांना कसे बाहेर ढकलणार ते सांगा. ते जास्त महत्त्वाचं आहे, असं म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात…?
‘ऐकावे ते नवलच असं सध्या आपल्य देशात घडत आहे. चीनपासून सावध राहा, असा इशारा हिंदुस्थानने म्हणे नेपाळला दिला आहे. आपले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांनी सांगितले आहे, नेपाळनं आशियातील श्रीलंकेसह सन्य देशांकडून शिकायला हवे आणि चीनपासून सावध राहायला हवे! श्रीमान रावतसाहेबांचा सल्ला चांगला आहे, पण नेपाळचा घास या आधीच चिनी ड्र्रॅगनने गिळला आहे. नेपाळचा घास गिळला जात असतांना हिंदुस्थानचे सरकार तेव्हा हा प्रकार षंढासारखे बघत राहिले. नेपाळ हे जगाच्या पाठीवरील एकमेव हिंदू राष्ट्र. श्रीराम व सीतामाईंशी नात्यानं जोडलेला हो देश. पण नेपाळमधील हिंदूत्व खतम होत असताना आम्ही काय केले? असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे.
नेपाळात जाऊन हस्तक्षेप करणे म्हणजे दुसऱ्या देशातील अंतर्गत बाबीत हस्तक्षेप करणे, या सबबीखाली आपण नेपाळचा रंग बदलताना उघड्या डोळ्याने सहन कला. मग आता नेपाळला फुकट सल्ले देण्यात काय फायदा? असा खडा सवाल शिवसेनेनं केला आहे.
आज चीन हिंदुस्थानपेक्षा नेपाळच्या जवळ जास्त आहे. चीनने नेपाळची संस्पृती बदलण्याचा प्रयत्न चालविला आहे. चिनी भाषा शिकवणारे 25,000 शिक्षक नेपाळच्या गावागावात घुसवले आहेत. चीनने नेपाळला कर्जाच्या ओझ्याखाली दाबले आहे. नेपाळी जनतेला गुलाम केले आहे.
चीन सातत्याने आपले सैन्य आणि आर्थिक ताकद वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. चीन अब्जावधी रुपयांचे पायाभूत सुविधांचे प्रकल्प हिमालयन रिजनमध्ये उभारण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तान, नेपाळ, मालदिवसारखी राष्ट्रे चीनच्या पकडीत आहेत. श्रीलंकेतही चीनने मोठी गुंतवणूक केलीच आहे. लडाखमध्ये चिनी सैन्य आज आतमध्ये घुसले आहे. त्यानंतर चीनच्या गुंतवणुकीचे काय करावे? हा प्रश्न निर्माण झाला. लडाख प्रकरण घडले नसते तर चीनचे अब्जावधी रुपये आपल्या देशात आलेच होते व त्याचे परकीय गुंतवणुकीचे कौतुक करताना मोदी सरकार थकत नव्हते.
डोकलामपासून लडाखपर्यंत चीनने भारताला धोकाच दिला आहे. अरुणाचलमध्ये घुसखोरी सुरूच आहे व लडाखमध्ये घुसून चिनी सैन्याने आमची जमीन ताब्यात घेतली आहे. अशा परिस्थितीत चीनच्या घुसखोरीवर संसदेत चर्चा करा असे सांगण्यात आले, तेव्हा समितीत चर्चा कोणत्या विषयांवर व्हावी झाली तर तीन्ही सैन्यदलाचे गणवेश बदलण्यावर. भाजपाचे भाजपचे खासदार सध्या जे काही करत आहेत तो मूर्खपणाचा कळस आहे. चीनपासून नक्की सावध कोणी राहायचे? चीनने हिंदुस्थानात घुसून आमच्या भूभागावर अतिक्रमण केले. त्यावर ना संसदेत चर्चा, ना संरक्षण खात्याच्या स्थायी समितीत चर्चा.
चीनचे पंतप्रधान हिंदुस्थान दौऱ्यावर आले व दिल्लीत न उतरता थेट मोदींच्या गावात अहमदाबादेत जाऊन झोपाळय़ावर झुलू लागले. तेथे त्यांनी शेव पापडी, गाठे, ढोकळा खाल्ला. त्या वेळी आम्ही याच स्तंभातून इशारा दिला होता- चीनपासून सावध राहा! ते खरेच ठरले.