हा जो कोणी लक्ष्मण सवदी गोधडीत रांगत होता त्याआधीपासून २० लाख मराठी बांधव महाराष्ट्रात येण्यासाठी संघर्ष करीत आहेत. सध्या बेळगावचा तिढा सर्वोच्च न्यायालयात लटकला आहे. त्यामुळे आता न्यायालयच काय ते ठरवेल. सूर्य-चंद्र आकाशात आहेत की नाहीत हे पाहून सर्वोच्च न्यायालय बेळगावप्रश्नी निकाल देणार नाही आणि सूर्य-चंद्र हे काही कुणाच्या बापाचे नोकर नाहीत.
सूर्याच्या ढळढळीत प्रकाशझोतात बेळगावचा लढा सुरू आहे. त्याच सूर्यप्रकाशात कानडी पोलीस ‘जय महाराष्ट्र’ म्हणणाऱया मराठी बांधवांवर अत्याचार करीत आहेत व रात्रीच्या अंधारात, चंद्राच्या शीतल प्रकाशात छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवीत असतात. पण तेथील मराठी बांधवांचे मनोधैर्य खचले नाही हाच शिवरायांचा आशीर्वाद आहे.
कर्नाटक सरकारचा १ नोव्हेंबर हा स्थापना दिवस असतो. हा दिवस सीमा भागातील मराठी लोक ‘काळा दिवस’ म्हणून पाळतात. ही वेळ २० लाख मराठी बांधवांवर कोणी आणली? भाषावार प्रांतरचना केल्यावर मराठी भाषिकांना त्यांच्या हक्काच्या राज्यात जाण्याचा अधिकार का नाकारला गेला? २० लाख मराठी भाषिकांचा आक्रोश, किंकाळ्या, सांडलेले रक्त आणि बलिदानाची पर्वा न करता निव्वळ दडपशाही मार्गाने मराठी भावना चिरडून त्यांना कानडी मुलखात कोंबले हा अन्याय नाही का?
हा अन्याय सूर्य- चंद्राच्या साक्षीनेच झाला. तेथील मराठी भाषा, मराठी शाळा, मराठी नाटय़गृहे, मराठी ग्रंथालये याबाबत अत्यंत अमानुष वर्तन स्वतंत्र हिंदुस्थानात केले जात आहे. १ नोव्हेंबर हा ‘काळा दिवस’ पाळण्याचे तेदेखील एक कारण आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत तेथील मराठी बांधवांशी किमान माणुसकीने वागायला काय जाते?
महाराष्ट्रातही लाखो कानडी बांधव आपले उद्योग-व्यवसाय करीत सुखाने राहत आहेत हे लक्ष्मण सवदीसारख्या मंत्र्याने विसरू नये. बेळगावातील भगवे झेंडे उतरवून ते पायदळी तुडवले जातात, छत्रपती शिवरायांचे पुतळे रातोरात उखडले जातात, मराठी भाषेतले फलक तोडले जातात हा मोगलाईचाच प्रकार आहे.
महाराष्ट्रातील राज्यपालांनी या अत्याचारांविरोधात कर्नाटकातील राज्यपालांशी कडक शब्दांत बोलायला हवे. किमानपक्षी राज्यपालांनी बेळगावच्या शिष्टमंडळास पंतप्रधान मोदींची वेळ मिळवून द्यायला मदत केली पाहिजे.
Read Also :
मराठा आरक्षणासाठी मराठा संघटना काढणार मोर्चा, 7 नोव्हेंबरला मातोश्रीवर धडकणार
कामाचा माणूसच पक्षात घ्या, भाजपला एक नंबरचा पक्ष करा, दानवेंचा कार्यकर्त्यांना सल्ला