सध्या राजकीय वर्तुळात पार्थ पवार हे चांगलेच चर्चेत आलेले आहेत. शरद पवारांनी पार्थ अम्याच्युअर असल्याचे म्हंटल्या नंतर संपूर्ण मीडियामध्ये याच विधानाची चर्चा होती. मात्र त्यानंतर अजित पवार आणि स्वतः पार्थ पवार हे देखील शरद पवारांना भेटले आता तरी हे प्रकरण शांत होईल असे वाटत असताना या सर्व प्रकाराला शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून ‘कडू कारल्याची’ उपमा देण्यात आली आहे.
चि. पार्थ पवार हे राजकारणात नवीन आहेत. लोकसभेची त्यांची उंच उडी चुकली आहे. त्यांना थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल. अशा शब्दात पार्थ यांना सामनामधून खडे बोल सुनावण्यात आले आहे. तसेच घरातच राजकीय व्यायामशाळा आहे. त्यामुळे मल्लखांब वगैरे कसरतीचे प्रयोग करून कसदार बनायची संधी आहे. शरद पवारांचे बोलणे हे आजोबांचा सल्ला म्हणजेच आशीर्वाद यादृष्टीने घेतले तर मनावरचा ताण कमी होईल असे देखील सामनामधून सांगण्यात आले आहे.
पक्षाची धुरा सांभाळणाऱ्यांना अनेकदा ‘कटू’ बोलावे लागते. असे म्हणत शिवसेनाप्रमुखांनी अनेकदा हे कडू घोट स्वकीयांना पाजले आहेत. जाहीरपणे कान उपटले आहेत. महात्मा गांधी, नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी इतकेच काय, पंतप्रधान मोदी यांनीही वेळोवेळी स्वकीयांना कडू कारल्याची भाजी खायला घातलीच असल्याची देखील आठवण यावेळी करून देण्यात आली आहे.
जेष्ठांनी असेच वागायचे असते, शरद पवार वेगळे वागलेले नाहीत असे देखील सामनातून सांगण्यात आले आहे. मात्र आता ही कडू कारल्याची उपमा पार्थ पवार यांच्या किती पचनी पडते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.