सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण अजून पूर्णपणे थंड झालेले नसताना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची चौकशी करावी यासाठी आता त्यांच्या पत्नी येत्या १५ ऑगस्ट पासून मंत्रालयाजवळ असलेल्या गांधी पुतळ्यापाशी सत्याग्रह करण्यासाठी बसणार आहेत. विशेष म्हणजे हा तपास पूर्ण व्हावा यासाठी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे देखील नाईक कुटुंबियांसोबत गेल्या काही दिवसांपासून तपासाबाबतची मागणी करत आहेत.
सुशांत सिंगच्या आत्महत्येचे प्रकरण गाजत असताना 2018 साली आत्महत्या केलेल्या मुंबईतील आर्किटेक्ट अन्वय नाईकच्या दोषींवर कारवाई करून त्याच्या कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी ठाण्यातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. मात्र त्यावर अद्याप राज्य सरकारने कोणत्याही प्रकारच्या तपासाला सुरुवात न केल्याने अन्वय नाईक यांच्या पत्नीने आता सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या वर्षभरापासून मी माझ्या पतीच्या आत्महत्या प्रकरणाबाबत शासनाने चौकशी करावी अशी मागणी करत आहे. मात्र मला गृह खात्याकडून अद्याप कोणतेही उत्तर मिळालेले नाही म्हणून अक्षता नाईक या आता थेट सत्याग्रह करणार असल्याचे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये सांगितले आहे तसेच संपूर्ण देशवासीयांनी देखील मला न्याय मिळवा म्हणून आवाज उठवावा असे आवाहन त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.
त्याचबरोबर प्रताप सरनाईक यांनी देखील एका मराठी भगिनीला न्याय मिळावा यासाठी आपण तिच्या सोबत सत्याग्रहामध्ये उतरणार असल्याचे सांगितले आहे. अन्वय नाईक प्रकरणामध्ये एका वरिष्ठ पत्रकाराचे नाव आहे तरीही त्यावर कारवाई का झाली नाही असा सवाल देखील यावेळी सरनाईक यांनी उपस्थित केला आहे. १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन आहे मात्र तोपर्यंत राज्य सरकारकडून याबाबत कोणताही निर्णय न आल्यास स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सत्याग्रहासाठी बसणार असल्याचे आमदार सरनाईक यांनी सांगितले.
काय आहे नेमके अन्वय नाईक प्रकरण
अलिबाग पोलिसात दाखल असलेल्या एफआयआरनुसार,पत्रकार (अर्णब गोस्वामी) यांच्या मुंबईतील स्टुडिओचे काम मराठी आर्किटेक्ट अन्वय नाईक यांच्या कंपनीने केले होते.त्या कामापोटी उर्वरित रक्कम 83 लाख रुपये गोस्वामी यांनी नाईक यांना काम पूर्ण झाल्यानंतरही दिली नाही. वारंवार मागणी करूनही कामाचे हे पैसे परत न मिळाल्याने आर्थिक व मानसिक दडपण आल्याने नाईक यांनी 5 मे 2018 रोजी आत्महत्या करून जीवन संपवले होते. त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये अर्नब गोस्वामी यांचे देखील नाव होते..
मराठी आर्किटेक्ट अन्वय नाईकच्या आत्महत्येसाठी जबाबदार असणाऱ्या वरिष्ठ पत्रकारावर कारवाई व्हावी यासाठी त्यांच्या पत्नी अक्षता नाईक 15 तारखेला मंत्रालयाजवळ सत्याग्रह करणार आहेत. एक सामान्य मराठी स्त्रीला न्याय मिळावा यासाठी माझा त्यांना संपूर्ण पाठिंबा आहे. #JusticeForAnwayNaik pic.twitter.com/tgt4DmpIMv
— Pratap Sarnaik (@PratapSarnaik) August 11, 2020