सुशांत सिंगच्या आत्महत्येचे प्रकरण गाजत असताना 2018 साली आत्महत्या केलेल्या मुंबईतील आर्किटेक्ट अन्वय नाईकच्या दोषींवर कारवाई करून त्याच्या कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी ठाण्यातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीचे संपादक (अर्नब गोस्वामी ) यांच्या नावाचा उल्लेख देखील असल्याचे प्रताप सरनाईक यांनी म्हंटले आहे.
काय आहे नेमके अन्वय नाईक प्रकरण
अलिबाग पोलिसात दाखल असलेल्या एफआयआरनुसार,पत्रकार (अर्णब गोस्वामी) यांच्या मुंबईतील स्टुडिओचे काम मराठी आर्किटेक्ट अन्वय नाईक यांच्या कंपनीने केले होते.त्या कामापोटी उर्वरित रक्कम 83 लाख रुपये गोस्वामी यांनी नाईक यांना काम पूर्ण झाल्यानंतरही दिली नाही. वारंवार मागणी करूनही कामाचे हे पैसे परत न मिळाल्याने आर्थिक व मानसिक दडपण आल्याने नाईक यांनी 5 मे 2018 रोजी आत्महत्या करून जीवन संपवले होते. त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये अर्नब गोस्वामी यांचे देखील नाव होते.
प्रताप सरनाईक यांनी नेमक्या काय मागण्या केल्या आहेत
काही वर्षांपूर्वी ठाण्यात बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणात ‘सुसाईड नोट’ ग्राह्य धरून आरोपीना अटक करण्यात आली होती. तीच तत्परता आर्किटेक्ट अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात का दाखवली गेली नाही ?
अर्णब गोस्वामी यांचे सुसाईड नोटमध्ये पहिले नाव आहे. अर्णब गोस्वामी यांना केंद्र व राज्य सरकारमधील कोणत्या नेत्याने त्यावेळी वाचविण्याचा प्रयत्न केला ? याचीही चौकशी झाली पाहिजे.
सुशांतला न्याय मिळालाच पाहिजे,पण तशीच तत्परता दाखवून अन्वयच्या आत्महत्येप्रकरणी सखोल तपास करून, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी.अशी विनंती सरनाईक यांनी केली आहे.
तसेच न्याय हा फक्त हिंदी भाषिकांनाच मिळणार का ? मराठी उद्योजकांच्या न्यायचं काय असा सवाल देखील सरनाईक यांनी उपस्थित केला आहे.
मराठी आर्किटेक्ट अन्वय नाईक यांनी 2 वर्षांपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पहिले नाव अर्णब गोस्वामींचे आहे. सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणाप्रमाणे अन्वयच्या आत्महत्येतील गुन्हेगारांवरही कारवाई व्हायलाच हवी असे मी गृहमंत्री @AnilDeshmukhNCP यांना अन्वयचा FIR रिपोर्ट जोडून लिहिले आहे pic.twitter.com/9hXOY5CE4h
— Pratap Sarnaik (@PratapSarnaik) August 6, 2020