मुंबई : महाराष्ट्रात मंदिरे उघडा असे ‘घंटानाद’ करून सांगितले जात आहे. मंदिरांची टाळी तोडून आत जाऊ, अशा धमक्या दिल्या जात आहेत. या मंडळींना मुंगेरचा हिंसाचार, हिंदुत्वाचा अवमान याबाबत काहीच घेणं- देणं पडलेलं दिसत नाही. सोयीचे हिंदुत्व हे असेच असते,” अशी टीका शिवसेनेने सामना संपादकीयमधून केली आहे.
दुर्गापूजेच्या विसर्जन यात्रेत हा सर्व गोंधळ झाला व पोलिसांनी सरळ बंदुका चालवल्या. अनुराग पोद्दार हा फक्त 18 वर्षांचा तरुण त्यात मारला गेला. दुर्गापूजा विसर्जनाबाबत हा गोंधळ, हिंसाचार व पोलिसी गोळीबार प. बंगाल, महाराष्ट्रासारख्या राज्यांत घडला असता तर एव्हाना ‘घंटा बजाव’छाप पोकळ हिंदुत्ववाद्यांनी नंगानाच घातला असता,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.
“बिहारात विधानसभा निवडणुकांची पहिली फेरी संपली आहे. पंतप्रधान मोदींसह अनेक नेत्यांनी बिहारच्या प्रचार सभांत लोकांना विचारलं की, ‘‘तुम्हाला जंगलराज पुन्हा हवे आहे काय ? नको असेल तर भाजप आणि जदयुला मतदान करा!’’ गेल्या पंधरा वर्षांपासून बिहारात नितीशकुमारांचेच राज्य आहे याचा विसर या मंडळींना पडलेला दिसतोय. मुंगेर जिल्ह्यात दुर्गा विसर्जनाच्या वेळी पोलिसांनी गोळीबार केला. मूर्ती खेचून विसर्जन करायला लावले. गोळीबारात एकजण ठार तर पंधरा लोक जखमी झाले. पोलिसांचे हे कृत्य जनरल डायरला लाजवणारे होते, असा आक्रोश सुरू आहे.
आपला तो बाब्या आणि दुसऱ्यांचं ते कार्टं, अशा पद्धतीचा कारभार सध्या भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे. बिहार, उत्तर प्रदेश, हरयाणा राज्यांत सध्या जे घडते आहे ते पाहता तेथे कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य आहे काय? असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, पण ही राज्ये भाजपशासित असल्यामुळेच तेथे सर्व आलबेल आहे. गडबड फक्त महाराष्ट्र, पंजाब, प. बंगालात, राजस्थानातच आहे,” असा टोला शिवसेनेने लगावला आहे.
मुंगेरातील दुर्गा प्रतिमेचा अवमान व गोळीबार म्हणजे ‘जंगलराज’ आहे असे या ढोंगी डोमकावळ्यांना वाटू नये याचं आश्चर्य वाटतं. एकतर बिहारातील भाजपने डोळ्यांवर ‘सेक्युलर’ चष्मा चढवल्याने त्यांना मुंगेरची आक्रोश करणारी दुर्गामाता दिसत नाही. महाराष्ट्रात मंदिरे उघडा असे ‘घंटानाद’ करून सांगितले जात आहे. मंदिरांची टाळी तोडून आत जाऊ, अशा धमक्या दिल्या जात आहेत. या मंडळींना मुंगेरचा हिंसाचार, हिंदुत्वाचा अवमान याबाबत काहीच घेणं- देणं पडलेलं दिसत नाही. सोयीचे हिंदुत्व हे असेच असते. मुंगेरातील हिंदुत्व रक्ताच्या थारोळ्यात पडले. संपूर्ण बिहारवर त्या रक्ताचे शिंतोडे उडाले, पण हिंदुत्वाचे सर्व राजकीय ठेकेदार तोंडावरची मुखपट्टी डोळ्यांवर ओढून गप्प बसले आहेत.
महाराष्ट्र, प. बंगालसारख्या राज्यांत हे असे काही दुर्दैवाने किंवा अपघाताने घडले की, यांचे हिंदुत्व दक्ष आणि सावधान होते. उत्तर प्रदेशात अबलांवर बलात्कार व खून झाले, साधू आणि पुजाऱ्यांना मंदिरातच निर्घृणपणे मारले गेले. हरयाणात एका मुलीला भररस्त्यात ठार केले. त्या प्रसंगास ‘लव्ह जिहाद’चे लेबल चिकटवून मोकळे झाले. भाजपशासित राज्यांत घडणाऱ्या या घटनांकडे बेगडी हिंदुत्ववादी अत्यंत संयमाने, तटस्थपणे पाहतात,अशी खंत शिवसेनेने व्यक्त केली आहे.
Read Also
मुख्यमंत्र्यांना 'गांडूळ, पुळचट’ म्हणणे भोवले, नारायण राणेंच्या विरोधात गुन्हा
दाखल https://t.co/PjHcOgCI13#NarayanRane #Cmuddhavthackarey #ShivSena— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 30, 2020