मुंबई : शिवसैनिकांकडून मारहाण झालेल्या अधिकाऱ्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याचीच मागणी केली. त्यानंतर आता शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून या मागणीचा चांगलाच समाचार घेण्यात आला आहे.
“हे महाशय जी काही मागणी करतील ती करूद्यात, पण आपल्या सैनिकी पेशाला जागून त्यांनी 20 जवानांच्या हत्येस जबाबदार असलेल्या राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षणमंत्र्यांच्याच राजीनाम्याची मागणी करायला हवी होती, पण सध्या आपल्या देशात जो खुळचट, बुळचट प्रकार सुरू आहे तो पाहता ऑलिम्पिकमध्ये ‘पोरखेळ’ प्रकारात एखादे सुवर्णपदक हमखास मिळेल” असे अग्रलेखात म्हटले आहे.
तसेच सामनातून या अधिकाऱ्याच्या कृत्याबाबत काही सवाल उपस्थित केले आहेत. नौदल अधिकाऱ्य़ावर संतप्त शिवसैनिकांनी हल्ला केला, याचे समर्थन कोणी करणार नाही, त्याचा निषेध व्हायलाच हवा; पण हे जे कोणी निवृत्त अधिकारी महोदय आहेत, त्यांनी राज्याचे लोकनियुक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतचे आक्षेपार्ह व्यंगचित्र सोशल माध्यमांवर फिरवून काय मिळवले? घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीचा सन्मान राखा, असे या महोदयांना नौदल सेवेत असताना कोणी शिकविले नव्हते काय? तुम्ही ज्या राज्यात राहता, कमवताय, सुखाने जगताय त्या राज्यातील नेत्यांविषयी काहीही वेडेवाकडे बोलायचे व त्यावर संतापलेल्या कोणी तुमचे मुस्काट फोडले तर त्यास अन्याय, अत्याचार, स्वातंत्र्यावर घाला वगैरे शेलकी विशेषणे वापरून राजकारण करायचे” असे अग्रलेखात म्हटले आहे.
चीनच्या प्रश्नावरून लक्ष हटविण्यासाठी खटाटोप सुरू आहे. महागाई, बेरोजगारी या जणू समस्या नाहीत, तर गल्लीबोळातले प्रश्न याच राष्ट्रीय समस्या आहेत, असे वातावरण सरकारी पक्षाच्या सायबर फौजा तयार करीत आहेत. आता त्यांनी या महान राष्ट्रीय कार्यास पुढे नेण्यासाठी मुंबईची निवड जाणीवपूर्वकच केल्याचे देखील सामनातून म्हंटले आहे.