मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिन यंदाही साधेपणाने साजरा केला जात आहे. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे महाराष्ट्रात स्थिती बिकट झाली आहे. यातच राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. आता महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून मोदी सरकारवर शाब्दिक हल्ला चढविण्यात आला आहे. ‘महाराष्ट्राने दिल्लीची फालतू गुलामी कधीच पत्करली नाही’, अशा शब्दात थेट केंद्र सरकारला इशाराच देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात मराठी बाण्याचा मुख्यमंत्री आणि सरकार असल्यामुळे दिल्लीचे आजचे पातशहा महाराष्ट्राची हरतऱ्हेने कोंडी करत आहेत. राज्यातलं लसीकरण दिल्लीच्या आडमुठेपणामुळे थांबलं आहे. ज्या महाराष्ट्रानं देशाला आर्थिक प्राणवायूचा पुरवठा केला, त्या महाराष्ट्राला आज प्राणवायूचा तुटवडा जाणवतो आहे. महाराष्ट्रात काहीही करून राजकीय आणि आर्थिक गोंधळ निर्माण करून राज्य बदनाम करण्याचे कारस्थान सुरू आहे, असा आरोप सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.
दिल्लीतील सरकारे बदलत राहिली, तरी महाराष्ट्राशी वैर काही संपलेले नाही. महाराष्ट्राचे हक्काचे काही मिळूच द्यायचे नाही. महाराष्ट्राला ओरबाडायचे, त्याची लूट करायची हे धोरण मात्र सर्व काळात कायम राहिले. राज्यातल्या अनेक योजना आणि प्रकल्प गुजरातला नेऊन ठेवले मुंबईचं महत्त्व कमी करायचं आणि राज्याची आर्थिक रसद तोडायची हाच त्यामागचा हेतू असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
महाराष्ट्राने दिल्लीची फालतू गुलामी कधीच पत्करली नाही. महाराष्ट्राला इतिहास आहे, बूड आहे, म्हणून तो आज टिकला आहे. आज महाराष्ट्रावर मोठे संकट आहे. कोरोना विषाणूने मोठे आव्हान उभे केले आहे. शंभर वादळे, शंभर भुकंपांनी पडझड होणार नाही, त्यापेक्षा जास्त पडझड एका विषाणूने केली आहे. महाराष्ट्र लढत आहे, महाराष्ट लढत आहे आणि विजयी होईल, असा विश्वास देखील सामनाच्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आला आहे.