मुंबई : ‘मुंबई महापालिकेवरील भगवा उतरवण्याची अवदसा आठवली असेल तर त्या अवदसेचे थडगे मुंबईची तमाम जनता बांधून त्यावरही भगवा फडकवेल अशा शब्दात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे .
खरंतर, आगामी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी आता भाजप आणि सत्ताधारी शिवसेनेमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे. बिहार निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळाल्यानंतर भाजपने आता मुंबई महापालिकेचाही गड राखण्यासाठी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. इतकंच नाही तर पालिकेवर फक्त भाजपचा झेंडा असणार असाही विश्वास भाजप नेत्यांनी बोलून दाखवला. त्यावर आज शिवसेनेनं घणाघाती टीका केली आहे.
‘मुंबई म्हणजे सदैव उसळणारा अग्नी आहे. या अग्नीचा रंग भगवा आहे. भगवा शुद्धच आहे. भगव्याला हात लावाल तर जळून खाक व्हाल’ असा थेट इशारा शिवसेनेकडून भाजपला करण्यात आला आहे. दरम्यान, ‘मुंबई महापालिकेवरील भगवा उतरविण्याची भाषा करणे म्हणजे महाराष्ट्राचा मुंबईवरील हक्क नाकारण्यासारखेच आहे.
मुंबई महापालिकेवरील भगव्यास हात घालू असे सांगणे म्हणजे मराठी माणसांचे मुंबईशी नाते तोडण्यासारखेच आहे. भगवा उतरविणे म्हणजे मुंबई पुन्हा भांडवलदारांच्या घशात घालून मराठी माणूस, श्रमिक, मजुरांना गुलाम करण्यासारखेच आहे’ अशा शब्दात शिवसेनेनं भाजपला उत्तर दिलं आहे.
काय लिहलं आहे अग्रलेखात?
मुंबई महापालिकेवरील भगवा उतरवण्याची अवदसा आठवली असेल तर त्या अवदसेचे थडगे मुंबईची तमाम जनता बांधून त्यावरही भगवा फडकवेल. मुंबई महापालिकेवरील भगवा हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे तेज आहे. भूगर्भामध्ये प्रचंड खळबळ माजून पृथ्वीच्या तप्त अंतःकरणाचे कढ बाहेर आले आणि शांत झाले. त्यातूनच सह्याद्रीचा जन्म झाला.
त्याच खळबळीत मुंबईचा जन्म झाला. मुंबई म्हणजे सदैव उसळणारा अग्नी आहे. या अग्नीचा रंग भगवा आहे. भगवा शुद्धच आहे. भगव्याला हात लावाल तर जळून खाक व्हाल. इतिहासाच्या पानोपानी याचे दाखले आहेत. मुंबई महापालिकेवर नव्या ईस्ट इंडिया कंपनीचा ‘युनियन जॅक’ फडकविण्याची भाषा करणाऱ्यांनी हे विसरू नये.
मुंबई जिंकण्याचा चंग भारतीय जनता पक्षाने बांधला आहे. भारतीय जनता पक्षाने असे ठरवले आहे की, या वेळी मुंबई महानगरपालिकेवर शुद्ध भगवा फडकवायचा. आता हा शुद्ध भगवा म्हणजे नक्की काय प्रकार आहे? बेशुद्ध अवस्थेत केलेले हे विधान आहे.
बिहारच्या निवडणुका भारतीय जनता पक्षाने जिंकल्या आहेत, पण त्या जिंकताना त्यांचा कसा दम निघाला ते देशाने पाहिले. बिहार निवडणुकीचे प्रभारी आपले देवेंद्र फडणवीस होते. त्यामुळे विजयाचे श्रेय मोदींइतकेच फडणवीस यांच्याकडेही जाते. प्रश्न इतकाच आहे की, बिहारच्या विजयाने भाजपचा नक्की कोणता झेंडा पाटण्यावर फडकला आहे? विचारांचा झेंडा एकच असतो. त्यात भेसळ असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. बिहारवर भगवा फडकवू किंवा भगवा फडकला असे विधान भाजप पुढाऱ्यांकडून झाल्याचे स्मरत नाही. कारण त्यांचा तसा भगव्याशी संबंध नाही. शिवसेनेशी युती झाल्यापासून त्यांचा भगव्याशी संबंध आला