मुंबई : मागील काही दिवसांपासून अभिनेत्रा कंगना राणावत आणि शिवसेना नेते यांच्या मुंबईवरून चांगलीच जुंपली आहे. मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने संतापलेल्या शिवसेनेने आजच्या सामना अग्रलेखातून कंगनावर सडकून टीका केली आहे.
मुंबई म्हणजे पाकव्याप्त काश्मीर वगैरे विधान करून समस्त मराठी जनांचा, मुंबईसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचा अवमान करणाऱ्या उपऱ्या व्यक्तिविरोधात सभागृहात पक्षभेद मोडून आवाज उठायलाच हवा. त्यात विरोधी पक्षनेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहन शिवसेनेने अग्रलेखात केले आहे.
अग्रलेखात म्हटले आहे की, महाराष्ट्र जितका शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा आहे, तितकाच तो भाजपचाही असायलाच हवा. महाराष्ट्राच्या हुतात्म्यांचा अपमान ही मंडळी कसा काय सहन करू शकतात? मुंबईत खाऊन, ‘पिऊन’ तरारलेली एक महिला फिल्मी कलावंत मराठी अस्मितेवर दारूच्या गुळण्या टाकते हे सहन करता येणार नाही आणि राज्याच्या विधिमंडळात या प्रकाराची निंदा करायलाच हवी.
मुंबईचा व पोलिसांचा अवमान करणाऱया त्या ‘मेंटल’ महिलेस महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, असे राज्याचे गृहमंत्री ठणकावून सांगत असतील, तर तीच महाराष्ट्राची लोकभावना आहे हे मान्य करावे लागेल. गृहमंत्री देशमुख, मुंबईचे पोलीस आयुक्त व संपूर्ण पोलीस दलावर विधानसभेने विश्वास व्यक्त करणे गरजेचे आहे. मुंबई पोलीस ‘माफिया’ आहेत असे विधान करणाऱ्यांचीच चौकशी व्हायला हवी,” अशी मागणी शिवसेनेने अग्रलेखातून केली आहे.