सिंधुदुर्ग – कोकण म्हणजे शिवसेना हे समीकरण केवळ माझ्यामुळे होतं. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही, असे वक्तव्य भाजप खासदार नारायण राणे यांनी केले. महाविकासआघाडीने भाजपला दणका वैगेरे दिलेला नाही. आकडेवारी समोर आल्यानंतर खरे चित्र स्पष्ट होईल. यावेळी भाजपने शिवसेनेची ताकद असलेल्या ग्रामपंचायतींमध्येही मुसंडी मारली आहे. पुढच्यावेळेस कोकणात शिवसेना औषधालाही सापडणार नाही, असे नारायण राणे यांनी म्हटले.
नारायण राणे यांचे वर्चस्व असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 70 पैकी 47 ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकल्याची माहिती समोर येत आहे. तर वैभववाडी, मालवण आणि कुडाळ या सर्व भागांमध्ये भाजपला मोठे यश मिळाल्याचा दावा भाजपच्या नेत्यांकडू केला जात आहे. हा शिवसेनेच्या कोकणातील वर्चस्वाला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपने आपले वर्चस्व कायम राखले आहे. भाजपाकडे 43 ग्रामपंचायती तर सेनेकडे 23 ग्रामपंचायती आल्या आहेत. राष्ट्रवादीने 1 आणि गाव पॅनेलने 3 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. जिल्ह्यात राणेंनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. मालवनमध्ये आमदार वैभव नाईक यांना मोठा धक्का बसला आहे.