नाशिक : महाराष्ट्रामध्ये काल एका दिवसात करोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली असून, दिवसभरात ६३ हजार ७२९ रुग्णांची नोंद झाली आहे, तर दिवसभरात ३९८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. या आकडेवारीमुळे राज्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे.
तसेच राज्यातील अनेक प्रमुख शहरांमध्ये देखील रुग्णसंख्या वाढ होत असून, करोना साथीच्या फैलावात नाशिकने मुंबई, नागपूर आणि पुणे शहरालाही मागे टाकले आहे. इथे करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम आयसोलेशन, क्वारंटाईन, मिनी लॉकडाऊन, संचारबंदी असे अनेक उपाय करून देखील करोनाची साखळी तोडली जात नसल्याने, आता नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहरात लवकरच पूर्ण लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत.
त्यांनी या आशयाचे पत्र देखील मुख्यमंत्र्यांना लिहिले असून, आज त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, नाशिक शहारातील करोना परिस्थिती ही आता हाताबाहेर गेली असून, प्रचंड रुग्णसंख्या वाढीमुळे पोलीस प्रशासन व आरोग्य यंत्रणांवर प्रचंड भर येत आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यात लागू केलेल्या संचारबंदीच्या आदेशानंतरही जिल्ह्यात परिस्थिती ‘जैसे थे’च असून, नागरिक अनेक ठिकाणी करोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करताना आढळत आहेत. त्यामुळे ही साखळी तोडण्यात यश येत असून, आता समोर फक्त पूर्ण लॉकडाऊन हाच एक उपाय राहिला असल्याचे म्हटले आहे.
पोलीस प्रशासनाचे ही नागरिक ऐकत नसल्याने, सध्या असलेली इंजेक्शन, बेड, रुग्णवाहिका, ऑक्सिजन, करोना लस अशा आरोग्य सुविधांची कमतरता आणि रुग्णांची वाढ या गोष्टी अजून हाताबाहेर जाण्याआधी जिल्ह्यात लॉक डाऊन करण्यात यावा अशी स्थानिक संघटना आणि आमदारांचीही मागणी असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.
राज्यात मुख्यमंत्र्यांनी १५ एप्रिलपासून १ मे च्या सकाळपर्यंत (१४४ कलम) संचारबंदीचे आदेश दिले आहेत. तसेच या कडक निर्बंधांचे पालन संपूर्ण राज्यात योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिले आहेत.