नवी दिल्ली : भारत व चीन यांच्यात पूर्व लडाखच्या सीमेवर गेल्या सहा महिन्यांपासूनच्या तणावाचा तिढा सुटण्याच्या बेतात असल्याची चिन्हे आहेत. सर्व संघर्षस्थळांवरून ठरावीक मुदतीत सैन्यमाघारी आणि शस्त्रे परत घेण्यासाठी तीन टप्प्यांमधील प्रक्रियेबाबत दोन्ही बाजूंची सर्वसाधारण सहमती झाली आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी बुधवारी दिली.
या प्रस्तावातील ठळक बाबींमध्ये, करार झाल्यापासून एक दिवसाच्या आत सैनिकांची वाहतूक करणारी वाहने हटवणे, पँगाँग तळ्याच्या उत्तर व दक्षिण किनाऱ्यांवरील ठरावीक भागांतून फौजा माघारी घेणे, तसेच दोन्ही बाजूंच्या सैन्यमाघारीची पडताळणी करणे यांचा समावेश आहे.
दोन्ही बाजूंनी जे प्रस्ताव मान्य केले आहेत, त्याबाबत कॉर्प्स कमांडर्सच्या पुढील चर्चेत करारावर स्वाक्षरी करण्याची भारतीय लष्कर आणि चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी यांची तयारी असल्याचेही सूत्रांनी सांगितले. लष्करी चर्चेची नववी फेरी येत्या काही दिवसांतच होण्याची शक्यता आहे.
Read Also :