सोलापूर : उजनी धरणातील पाणी इंदापूरला पळवल्याचा आरोप सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर करण्यात आला होता. आता या आरोपांना प्रत्युत्तर देत आपल्यावरील आरोप सिद्ध झाले तर मंत्रीपद नव्हे तर आमदारकीचा राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेईन, असे भरणे यांनी म्हटले आहे.
उजणी धरणातील 5 टीएमसी पाणी इंदापूरला पळवल्याचा आरोप दत्तात्रय भरणे यांच्यावर करण्यात आला होता. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी हे आरोप केले होते. यावर आता भावूक होत भरणे यांनी सर्व आरोप फेटाळले.
उजनीचं पाणी जर इंदापूरसाठी घेतलं असलं तर राजकीय सन्यास घेईन. उजनी धरणाचं 5 टी एम सी पाणी इंदापूरला पळवल्याचा आरोप केला जातोय, मात्र, माझ्या भाकरीसाठी दुसऱ्याची भाकर कधी हिरावून घेणार नाही, असे म्हणत भरणे यांनी आरोपांना प्रत्युत्तर दिले.
जिल्ह्यातील नियोजित पाण्याचा एक थेंबही इंदापूरसाठी घेतलेला नाही. आरोप सिद्ध झाल्यास मंत्रीपद नव्हेतर आमदारकीचा राजीनामा देऊन संन्यास घेणार असल्याचं दत्तात्रय भरणे म्हणाले. सध्या कोरोना संकटाचा काळ आहे. अशा संकटात राजकारण करू नये, असे आवाहन देखील त्यांनी केले.