मुंबई : राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला असून, न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे, तसेच राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा देखील सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे.
दरम्यान, यावरून आता राज्यात राजकीय वातावरण तापले असून, राजकीय नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे सुरू केले आहे. मराठा आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस दिशाभूल करत असल्याचा आरोप केला होता.
त्यांच्या या विधानाला विरोधी पक्षनेते फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले असून, मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या काही याचिका राष्ट्रवादीच्याच काही लोकांनी दाखल केल्या होत्या. काही लोकांशी त्यांच्या बैठकाही झाल्या होत्या, असा गंभीर आरोप त्यांनी राष्ट्रवादीवर केला आहे.
तसेच, त्यांनी नवाबांवर निशाणा साधत, नवाब मलिक यांना खोटं बोलण्याचा रोग जडला आहे, अशी टीका केली आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल देखील केला. ५० वर्षात जे सरकार आरक्षण देऊ शकलं नाही ते आम्ही दिलं. मात्र भाजप सरकारनं आरक्षण दिलं, त्यांना श्रेय मिळू नये, असं सत्ताधाऱ्यांना वाटतं. हे सरकार हात झटकत आहे, हे योग्य नाही. त्यांना आरक्षण द्यावंच लागेल, असं फडणवीस म्हणाले आहेत.