मुंबई – महाराष्ट्र सरकारमधील महसूलमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवल्यानं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी नाराज असल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सोनिया गांधी या निर्णयाच्या बाजूने नाहीत. दोन दिवसांपूर्वीच बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेऊन महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार होण्याचे संकेत दिले होते.
त्यानंतर सोनिया गांधींनीसुद्धा संबंधित नेत्यांची चांगलीच कानउघाडणी केलीय. बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याची मागणी कोणी केली, असा सवालच त्यांनी काँग्रेसच्या ‘त्या’ नेत्यांना विचारलाय. संकटाच्या काळात पक्षाला जास्त साथ देणाऱ्या नेत्यांपैकी बाळासाहेब थोरात एक आहेत. खरं तर थोरातांच्या राजीनाम्याच्या मागणीमागे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी असल्याची माहिती समोर येत आहे.
बाळासाहेब थोरात हे ठाकरे सरकारमध्ये महसूलमंत्री असतानाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षसुद्धा आहेत. तसेच काँग्रेस पक्षाचे विधिमंडळातील नेतेही आहेत. त्यामुळेच महाराष्ट्र काँग्रेसमधील एक गट बाळासाहेब थोरातांच्या विरोधात काम करतोय. एवढी सगळी पदं बाळासाहेब थोरातांकडेच कशाला, असाही काँग्रेसमध्ये एक मतप्रवाह आहे. नुकतेच बाळासाहेब थोरात यांचे पुतणेही महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे काही बडे नेते थोरात यांनी प्रदेशाध्यक्षपदा सोडावे यासाठी दबाव आणत आहेत. त्यामुळे थोरात यांनी दोन दिवसांपूर्वी के. सी. वेणुगोपाल यांना भेटण्यासाठी राजीनामा देण्याची ऑफर दिली होती, पण काँग्रेसने अध्यक्ष सोनिया गांधी यामुळे नाराज आहेत.