मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबलेले यंदाचे पावसाळी अधिवेशन आजपासून दोन दिवस घेण्यात येणार आहे. या अधिवेशनावर कोरोनाचे सावट कायम आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक आमदाराची कोरोना चाचणी केली जाणार आहे. आमदारांना मास्क, फेस शील्ड, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज असे साहित्य दिले जाणार आहे.
अधिवेशनापूर्वी करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये दोन आमदारांसह 40 पेक्षा अधिक अधिकारी-कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. अधिवेशनाच्या आधी चाचण्या करणे बंधनकारक आहे, त्यामुळे शनिवारी आणि रविवारी असे दोन दिवस आरोग्य विभागाच्या वतीने विधान भवनाच्या बाहेर चाचण्या करण्यात आल्या.
अधिवेशनासाठी येणाऱ्या प्रत्येकाच्या शरीराचे तापमान प्रवेशद्वारावरच मोजण्यात येणार आहे. विधानभवनात जागोजागी र्निजतुकीकरण यंत्रे बसवण्यात आली आहेत. सोशल डिस्टेंसिंगचे पालन केले जाणार आहे. गेल्या दोन दिवसांत उद्योगमंत्री सुभाष देसाई, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यासह अन्य मंत्री, आमदार अशा एकूण २२०० जणांनी विधिमंडळ परिसरात कोरोना चाचणी करण्यात आली.