मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता दिसून येत आहे. सध्या महाराष्ट्रात कॉंग्रेस,शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाविकास सरकार आहे. परंतु कॉंग्रेस सातत्त्याने आगामी निवडणुकींसाठी स्वबळाचा नारा देत असताना दिसत आहे. त्यातच शिवसेनेच्या वर्धापन दिनी शिवसेनापक्ष प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधून बोचरी टीका केली.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचं लेटरबॉम्ब समोर आलं आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली. प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपशी जुळवून घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच सध्या सत्तेत सोबत असलेले मित्रपक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते फोडत आहेत, असा खळबळजनक आरोपही प्रताप सरनाईक यांनी या पत्रातून केला आहे.
यामुळे आता शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात एकांतात बंद दाराआड सुमारे तासभर चर्चा झाली असल्याची माहिती सध्या मिळत आहे. चंद्रकांत पाटील आज मुंबईतच होते. आज पहाटे त्यांनी भाजप नेत्यांसोबत आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या छोटेखानी कार्यक्रमात भाग घेतला.
या नंतर त्यांचा पालघरचा दौरा होता. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ निवासस्थानाकडे मोर्चा वळवला. चंद्रकांतदादा अचानक सागर निवासस्थानी आल्याने मीडियाचीही एकच धावाधाव उडाली. मात्र, ही भेट कशासाठी होती? अचानक भेट घेण्याचं कारण काय? याचा तपशील गुलदस्त्यात असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सुमारे तासाभराच्या चर्चेनंतर चंद्रकांतदादा पालघरकडे रवाना झाल्याचं सांगण्यात येत आहे.
या बैठकीला केवळ चंद्रकांत पाटील आणि फडणवीसच उपस्थित होते. या दोन्ही नेत्यां व्यतिरिक्त तिसरा नेता या बैठकीला उपस्थित नव्हता. या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दरवाजाआड बैठक झाल्याची माहिती सध्या मिळत आहे. त्यामुळे या बैठकीत नक्की काय रणनीती ठरली याबाबतच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.