नगर : राष्ट्रवादीचे शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. आज लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालामध्ये कर्जत मतदारसंघातील कुंभेफळ आणि खेट गावात भाजपचा सरपंच निवडून आला आहे तर कर्मनवाडी येथे रोहित पवार समर्थकाचा सरपंच निवडला गेला आहे.
यातच सिंधुदूर्गात शिवसेनेचे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना मोठा धक्का बसला आहे. आचरा ग्रामपंचायत भाजपकडे गेली आहे. तर वालावलमध्येही भाजपने सत्ता स्थापन केली आहे. यातच सांगलीत ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालादरम्यान जोरदार वाद झाला आहे. सांगलीतील जुना राजवाडा येथील मतमोजणी केंद्राबाहेर दोन गट एकमेकांच्या अंगावर धावून आले आहे. त्यामुळे मोठा गोंधळ त्याठिकाणी बघायला मिळत आहे.
दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मनसेने खातं उघडलं आहे. जव्हाळे ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा रोवला आहे. या ग्रामपंचायतीत संगीता कैलास गायकवाड यांना ५५८ मते मिळाली असून त्यांची थेट सरपंच पदी निवड झाली आहे. तर विरोधी उमेदवार ठाकरे गटाच्या सीमा भाऊसाहेब पागेरे यांना ३९४ मते पडली आहे.