नवी दिल्ली : भारत कोरोना व्हायरस महामारीमुळे बिकट परिस्थितीत सापडला आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे हाहाकार उडाला असून, दररोज हजारो नागरिकांचा मृत्यू होत आहे. कोरोनारुग्णांना ऑक्सिजन, बेड्स, औषधांसाठी भटकावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मोदी सरकार ही परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. यातच आता भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्राला घरचा आहेर देत टीका केली आहे.
सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान कार्यालय काहीही कामाचे नसून, मोदींनी कोरोनाविरुद्धच्या लढाईचे नेतृत्व नितीन गडकरींकडे द्यावे, असे म्हटले आहे.
India will survive Coronavirus Pandemic as it did Islamic invaders and British Imperialists. We could face one more wave that targets children unless strict precautions now are taken. Modi should therefore delegate the conduct of this war to Gadkari. Relying on PMO is useless
— Subramanian Swamy (@Swamy39) May 5, 2021
सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, ज्याप्रमाणे भारत इस्लामिक आक्रमणं आणि ब्रिटीश साम्राज्यवाद्यांनंतरही टिकून राहिला त्याचप्रमाणे आपण करोना व्हायरसच्या साथीचा सामना करुन नक्कीच टीकू. आता आपण नीट काळजी घेतली नाही, योग्य निर्बंध लावले नाहीत तर मुलांवर परिणाम करणारी आणखीन एक लाट आपल्याकडे येईल. म्हणून मोदींनी या कोरोनाविरुद्धच्या युद्धाची जबाबदारी गडकरींकडे सोपवावी. पंतप्रधान कार्यालयावर अवलंबून राहणे फायद्याचं ठरणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी योग्य आरोग्य व्यवस्था उभारणीची गरज लागेल. यामध्ये गडकरींनी यापूर्वीच स्वत:ला सिद्ध करुन दाखवल आहे, असेही स्वामी म्हणाले.