चंद्र्पुर : कृषी आणि उद्योग क्षेत्रातील त्यांच्या अनुभवाचा फायदा वेगवान प्रगतीत होईल असे सांगत राऊतांनी शरद पवारांच्या मुख्यमंत्रिपदासाठी आग्रह करावा अशा शब्दात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टोला लगावला. ते चंद्रपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवरही टीका केली आहे.
महाविकास आघाडी सरकारला मजबूत करण्यासाठी आणि मोदींना हरवण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र यायला पाहिजे. शरद पवार हे नेतृत्व करू शकतात. ते सर्वमान्य नेते आहेत असं संजय राऊत म्हणाले होते. त्यांच्या या विधानाविषयी मुनगंटीवार यांना विचारलं असता शरद पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी संजय राऊतांनीच आग्रह करावा अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी चिमटे काढले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी अशोक चव्हाण यांना मराठा आरक्षणाच्या उपसमितीवरुन हटवा अशीही मागणी केली आहे.
आरक्षण म्हणजे जगण्याचा अधिकार आहे. मूळ प्रश्न सुटले नाही तर अशा पद्धतीने आरक्षणाच्या मागण्या पुढे येत असतात. ज्यांच्याकडे सातत्यानं सत्ता होती त्यांनी मूळ प्रश्न सुटण्याचे नियोजन केले नाही. त्यांना मराठ्यांची चिंता कमी आणि स्वपरिवाराची चिंता अधिक होती असा टोला मराठा आरक्षणासंदर्भात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला.
मागच्या सरकारने आरक्षण दिलं होतं ते टिकवणं गरजेचं होतं. आता कोर्टातही जी तयारी आवश्यक होती ती झाली नाही. आणि सर्व वेळ राजकारणात घालवला जात असून प्रश्नावर उत्तर नव्हे तर पुन्हा एक प्रश्न विचारला जातोय असे ते म्हणाले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांची मदत सरकार का स्वीकारत नाही? त्यांनाही या प्रक्रियेत सामावून घेण्यात काय वावगे आहे? असाही प्रश्न मुनगंटीवार यांनी विचारला.