रायगड : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अलिबाग येथे विद्यमान खासदार आणि उमेदवार सुनील तटकरे यांच्यासाठी महायुतीची आढावा बैठक पार पडली. यावेळी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांना सुनील तटकरे यांनी संबोधित केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी केलेल्या विकासाच्या झंझावातासमोर ‘इंडी’ आघाडी फार मोठ्या पिछाडीवर जाईल हे निश्चित आहे असा ठाम विश्वास याववेळी तटकरेंनी व्यक्त केला. एखाद्याच्या नावाचे नेतृत्व उदयाला येते त्यावेळी आपण बहुमताचे सरकार अनुभवतो. स्वर्गीय इंदिरा गांधींच्या नावाचा एक काळ होता त्यानंतर मात्र तसे घडले नाही परंतु २०१४ मध्ये नरेंद्र मोदींच्या नावाची आलेली लाट बघता आज देशाची स्थिरता आपण अनुभवत आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, मी कधीही लोकसभेत विरोधी पक्षात असताना वैयक्तिक कुणावरही टिकाटिप्पणी केली नाही. उलट माझ्या प्रत्येक भाषणात फक्त माझा मतदारसंघ आणि त्यातील विकासकामे याचाच विचार मांडला आहे. माझी स्वच्छ भूमिका माझ्या मतदारांपर्यंत ठेवणे माझे काम आहे. आम्ही यंत्रणांना घाबरून वेगळी भूमिका घेतली अशी टिका विरोधक करत आहेत .परंतु त्यावेळी विधानसभा निवडणुकीचा पूर्ण निकाल लागायच्या अगोदर भाजपला बाहेरुन पाठिंबा द्यायला सांगण्यात आले हे काय होते. असा सवाल करतानाच आम्ही राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी आणि राष्ट्रहित लक्षात घेत एनडीएच्या सरकारमध्ये सहभागी झालो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आज देशात निर्माण झालेली इंडिया नावाची आघाडी आम्ही तिला इंडी’ आघाडी बोलतो. नाव इंडिया मात्र एकत्रित आल्यावरही परस्परांच्या विरोधात लढत आहेत. अशी असणारी परिस्थिती आहे. संविधान बचाव रॅली नावाने पावसाळ्यातील एक भूछत्र उगवले आहे. हे भूछत्र संविधान बचाव नावाने वातावरण बिघडवत आहे. कॉंग्रेसच्या काळातही जुने कायदे बदलले गेले होते. मात्र आता जाणीवपूर्वक घटना बदलली जात आहे. असे संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जात आहे अशांच्या विरोधात ठाम उभे राहण्याची आवश्यकता आहे असे आवाहनही सुनील तटकरे यांनी नागरिकांना केले.
अनंत गीते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी दहा वर्षे विकास शोधत आहेत अशी टिका करत आहेत. मात्र तुम्ही पाच वर्ष त्याच मोदींच्या मंत्रीमंडळात मंत्री होतात. तुम्हाला मंत्री असताना विकास कंदील लावून शोधता आला नाही. तुम्ही तुमच्या निष्क्रियतेमुळे पराभूत झाला आहात.
ईद झाल्यावर माझा करेक्ट कार्यक्रम केला जाणार आहे असे वर्तमानपत्रात ठळकपणे छापून आले आहे. मात्र तुम्ही राजकीय पटलावरुन का बाजुला झाला आहात .याचा जरातरी विचार केला तर त्यातून आव्हान देणार्यांना उत्तर मिळेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडातील हा मावळा तुम्ही प्रचंड मतांनी निवडून द्याल असा विश्वास यावेळी व्यक्त केला. यावेळी शिवसेना आमदार महेंद्र दळवी, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रमेश पाटील,आदींसह महायुतीचे तालुकाध्यक्ष, तालुकाप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.