अकोला: अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसंदर्भात स्वराज्य भवन येथे काँग्रेसच्या झालेल्या बैठकीत बहुतांश नेते आणि पदाधिकारी तसंच लोकप्रतिनिधींनी स्वबळाचा नारा दिला होता. मात्र एक प्रवाह आघाडी करूनच निवडणूक लढण्याच्या बाजूला होता. त्यामुळे आता महाविकास आघाडीशी चर्चा करून अंतिम निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठी घेणार आहेत.
तसेच काँग्रेस नेत्यांवर सर्कलनिहाय जबाबदारी सोपवली असून ते उमेदवारांच्या चाचणीसह पक्षांच्या राजकीय स्थितीचा आढावा घेणार आहे. त्यानुसार पुढचा प्लॅन काँग्रेस पक्षाकडून आखण्यात येणार आहे. जानेवारी २०२० मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ५३ पैकी काँग्रेसचे ४ सदस्य निवडून आले होते. भाजप आघाडीने दोन अपक्षांना आघाडीत सामील करून घेतले होते. अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या निवडणुकीच्या वेळी ७ सदस्य असलेल्या भाजपने सभागृहात बहिर्गमन केले आणि वंचितचा विजय झाला होता. कधी नव्हे ती वंचितने संपूर्ण सत्ता स्थापन करण्यात यश मिळवले होते.
मुंबईतल्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष
आता १४ जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे पण अकोल्यात काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आले होते त्यावेळी त्यांनी स्वबळाचा नारा दिला होता. त्यामुळे या निडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडी सोबत जाते की स्वबळावर लढते हे मुंबईत होणाऱ्या बैठकीत ठरणार असल्याने या बैठकीडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नाना पटोले यांचा स्वबळाचा नारा
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढण्याचे संकेत शरद पवार यांच्याकडून अनेकदा देण्यात येत असले तरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे विधान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ११ जून रोजी अकोल्यात स्वराज्य भवन येथे पत्रकार परिषदेत केले होते. त्यामुळे त्याच स्वराज्य भवन येथे स्थानिक निवडणुकीत ‘एकला चलो रे’चा नारा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला. परिणामी आता आघाडी होईल की नाही, हे मुंबई येथे होणाऱ्या बैठकीत ठरणार आहे.