मुंबई : राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत ५५ ते ६० हजारांवर गेली असून, मृतांची संख्या देखील वाढत आहे. यामुळे राज्यात आरोग्य यंत्रणांची तारांबळ उडाली आहे. तसेच राज्यात आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत असून, अशा हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी, महाविकास आघाडी सरकारकडून राज्यात, १५ एप्रिलपासून १ मे च्या सकाळपर्यंत (१४४ कलम) संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी काल रात्री ८ वाजल्यापासून राज्यात सुरु झाली.
दुसरीकडे राज्यातल्या करोना परिस्थितीला घेऊन, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यातच आज, भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी, करोना रुग्णांच्या मृत्यूच्या आकडेवारीची लपवाछपवी केली जात असल्याचा गंभीर आरोप राज्य सरकारवर केला आहे.
किरीट सोमय्या यांनी ठाणे आणि वसईमधील आकडेवारीचा दाखला देत ट्विटर एक व्हिडीओ ट्विट केला असून, यात त्यांनी सरकार आणि प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
यावेळी व्हिडिओमध्ये त्यांनी, “१ ते १३ एप्रिल काळात वसई विरार शहरात २०१ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. पालिकेने मात्र २३ मृत्यू दाखवले आहेत. आयुक्त म्हणतात खासगी रुग्णालयातील मृत्यू आम्ही धरले नव्हते, सुधार करु. मात्र ठाणे महापालिका क्षेत्रात ५७ करोना मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच ठाण्यात स्मशानभूमींमध्ये एकूण ३०९ जणांवर अंत्यसंस्कार झाल्याची नोंद आहे,” असे म्हटले आहे.
कॉरोना मृतांची नोंद, ठाकरे सरकारची लपवाछपवी
1 ते 13 एप्रिल काळात वसई विरार शहरात २०१ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाले. पालिकेने मात्र २३ मृत्यू दाखवले आहेत
ठाणे महापालिका क्षेत्रात 57 कोरोना मृत्यूची नोंद झाली आहे, परंतू स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कार 309 झाले असल्याची नोंद आहे pic.twitter.com/k1gbDku0So
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 15, 2021
दरम्यान, “शहरातील खासगी रुग्णालयांत मृत्यू झालेल्या रुग्णांची नोंद पालिकेच्या दैनंदिन अहवालात केली जात नव्हती. या अहवालात केवळ पालिका रुग्णालयांतील मृतांच्या आकड्यांची नोंद होते. मात्र, यापुढे खासगी रुग्णालयांतील मृतांची नोंदही अहवालात करण्यात येईल,” असं स्पष्टीकरण वसई-विरार शहर महापालिका आयुक्त गंगाथरन डी यांनी दिली आहे.
राज्यात कडक निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, पुढचे १५ दिवस आणि रात्र राज्यभरातील प्रमुख शहरांमध्ये आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची करडी नजर असणार आहे. मात्र या कडक निर्बंधांचे पालन संपूर्ण राज्यात योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिले आहेत.