मुंबई : राज्य विधीमंडळाचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन पार पडले. अधिवेशनात आरक्षणाच्या मुद्यावरून गदारोळ पाहण्यास मिळाला. आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधानपरिषदेत गोंधळ झाल्यानंतर सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आल्यानंतर विरोधी पक्षांकडून ठाकरे सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे.
सरकारकडे फुटकळ चर्चेसाठी वेळ आहे, मात्र मराठा आरक्षणावर चर्चेसाठी वेळ नसल्याची टीका शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली आहे.
सरकारवर हल्ला चढवत मेटे म्हणाले की, विधानपरिषदेचे सर्व कामकाज थांबवून मराठा आरक्षणावर चर्चा घडवून आणावी अशी आम्ही मागणी केली होती. तसा प्रस्तावही सरकारला दिला होता. पण या मुद्द्यावर सरकारने कालही चर्चा करू दिली नाही आणि आज तर एक शब्दही काढू दिला नाही.
येत्या 25 जानेवारी रोजी मराठा आरक्षणावर अंतिम सुनावणी होणार आहे. त्याचं काय करणार आहे? सरकारने काय तयारी केली आहे? असा सवालही त्यांनी विचारला.