मुंबई – राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांनी संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. गायक रेणू शर्मा यांनी मुंडे यांच्याविरोधात शारिरिक छळाचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. खुद्द सामाजिक न्यायमंत्र्यांवरच बलात्काराचा आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात हादरा बसला होता. मात्र आज सकाळी (शुक्रवार) रेणू शर्मा यांनी कौटुंबिक कारणास्तव आपण ही तक्रार मागे घेतोय, असं पोलिसांना सांगितलं. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.
कौटुंबिक वादातून मी त्यांच्याविरोधात तक्रार दिली होती. परंतु आता मी ही तक्रार मागे घेते आहे, असं रेणू शर्मा यांनी पोलिसांनी सांगितलं. तशा प्रकारे पोलिसांना तिने लेखी लिहून दिलं आहे. मात्र रेणू शर्मांनी तक्रार मागे घेतल्याने विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत. अशातच धनंजय मुंडे यांनी तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकल्यानेच त्यांनी तक्रार मागे घेण्याचा निर्णय घेतला, असा गौप्यस्फोट भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी केला आहे.
रेणू शर्मा यांनी जरी तक्रार मागे घेतली असली तरी भाजपने मात्र यासंदर्भात धनंजय मुंडे यांच्यावर दबावाच्या राजकारणाचा आरोप केला आहे. अगोदरपासून तिच्यावर तक्रार मागे घेण्यासंबंधी दबाव होता. आता तिने ही तक्रार मागे घेतली आहे. आम्हाला याचं आश्चर्य वाटत नाही. आमचा मुद्दा हा आहे की धनंजय मुंडे यांनी प्रतिज्ञापत्रात दुसऱ्या बायकोचा उल्लेख तसंच तिच्यापासून झालेल्या दोन मुलांचा उल्लेख केला नाही ते कायद्याच्या परिघाबाहेर आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी प्रतिक्रिया उमा खापरे यांनी दिली.