बीड: राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय अत्यंत संवेदनशील होत असताना राज्य निवडणूक आयोगाकडून धुळे, नंदुरबार सह पाच जिल्हा परिषदा आणि ३३ पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणं हा तर ओबीसींवर घोर अन्याय आहे, असे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयात धाव घेणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम व नागपूर या ५ जिल्हा परिषदा तसेच त्यांतर्गतच्या ३३ पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे, यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पंकजाताई म्हणाल्या की, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय अत्यंत संवेदनशील होत असताना या निवडणुका जाहीर होणं हा ओबीसींवर घोर अन्याय आहे.
आमच्यासह कोर्टात धाव घ्या
राजकीय आरक्षणाचा विषय मार्गी लागेपर्यंत या निवडणुका न घेण्याची भूमिका मांडण्याबरोबरच आमच्या समवेत कोर्टातही धाव घ्यावी असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर
राज्यातील पाच जिल्हा परिषदेतील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात असल्याने राज्य निवडणूक आयोगाने येथे आचार संहितेसोबत निवडणूक कार्यक्रमाची आज घोषणा केली. यात राज्यातील पाच जिल्हा परिषदेच्या ७० जागांबरोबर ३३ पंचायत समितीच्या १३० निर्वाचक गणांसाठी निवडणूक घोषित करण्यात आली आहे. ओबीसी प्रवर्गासह पन्नास टक्के पेक्षा अधिक आरक्षण झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने अतिरिक्त आरक्षण रद्द केल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीत ही पोटनिवडणूक होत आहे.