मुंबई : शिवसेना आणि भाजपमध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शाब्दिक चकमक सुरू आहे. त्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी टीका केली आहे. शिवसेनेने हिंदुत्व सोडलेलं नाही. शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कायम आहे. फक्त महाराष्ट्रात या दोन्ही पक्षांमध्ये सॉफ्ट आणि हार्ड हिंदुत्वाची लढाई सुरू आहे, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.
यावेळी त्यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्रव्यवहारावरही प्रतिक्रिया केली. राज्यपालांची भूमिका योग्यच आहे. केंद्राच्या निर्णयाचं पालन होतं की नाही, हे पाहण्याचा आणि मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याचा अधिकार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना जे प्रत्युत्तर दिलंय त्याचा आशय केवळ मंदिर उघडण्याबाबतचा आहे,
असं सांगतानाच राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या पत्रव्यवहारात अदब पाळला गेला नाही, अशी टीकाही त्यांनी केली. तसेच, भाजपने सुरू केलेल्या मंदिर आंदोलनाला आमचा पाठिंबा नाही, असं सांगतानाच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना कायम असून सध्या राज्यात या दोन्ही पक्षात सॉफ्ट आणि हार्ड हिंदुत्वाची लढाई सुरू आहे, असंही ते म्हणाले.
भाजपने सुरू केलेलं मंदिर आंदोलन आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेत सुरू असलेली शाब्दिक चकमक या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्य सरकारने अद्यापही मंदिरं सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार मंदिरं उघडी न करून इतर पक्षांना आंदोलन करण्याची संधी देत आहे. त्यामुळे मंदिरं सुरू करण्यासाठी राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
उद्धव ठाकरेंनी पत्रात काय लिहिले?
“प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दलचे पत्र मिळाले. याबद्दल सरकार जरुर विचार करत आहे. जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे आणि म्हणूनच करोनाशी लढताना जसा एकदम लॅाकडाऊन करणे चुकीचे तसेच तो एकदम उठवणेही अयोग्यच. करोनासोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणे हे अंगवळणी पडावे म्हणून सध्या राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवली जात आहे.
आरोग्यविषयी सूचना देणे, जनजागृती करणे, आरोग्य तपासणी करणे, आवश्यकतेनुसार चाचणी व उपचार करणे हे सर्व आपल्या राज्यातील डॅाक्टर्स आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका नागरिकांच्या घरोघरी जाऊन करत आहेत. याची आपल्याला कल्पना असेलच. कदाचित असा प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे एकमेव अथवा पहिले राज्य असेल, अशी आठवण उद्धव ठाकरे यांनी करुन दिली.
“आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणार्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही. Have you suddenly turned ‘Secular’ yourselves, the term you hated? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे Secular असे आपले म्हणणे आहे का?
मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा ‘Secularism’ आहे तो आपल्याला मान्य नाही का? मला या संकटाशी लढताना काही divine premonition येतात का? असाही प्रश्न आपणांस पडला आहे. आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव असेल मात्र मी एवढा थोर नाही. इतर राज्यात, देशात बरे वाईट काय घडते आहे ते बघत माझ्या महाराष्ट्रात चांगले कसे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे” असेही उद्धव ठाकरेंनी सुनावले.
Read Also :
उघडली मथुरा काशी…आता खंडोबाची जेजुरी बाकी ! जागरण गोंधळ करत भाजपचे सरकारविरोधात आंदोलन https://t.co/amMTc7mijy#PuneBjp
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 13, 2020