मुंबई : देशात आणि राज्यात जागतिक महामारीने हाहाकार माजवला आहे. या महामारीने बाधित रुग्णांची संख्या एकीकडे देशात वाढत आहे, तर दुसरीकडे आरोग्य यंत्रणा या महामारीला तोंड देण्यासाठी सक्षम नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यावरून भाजपेतर पक्षांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला असून, यावरून देशातल्या काही भाजपशासित नसलेल्या राज्यांमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे.
देशाप्रमाणेच राज्यामध्ये देखील रेमेडीसीवर इंजेक्शन्स, ऑक्सिजन, बेड्स, आणि लसींचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे यावरून केंद्र-राज्य आणि सत्ताधारी-विरोधक हा संघर्ष धगधगत असून, एकमेकांवर टीका, आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडली जात नाहीये. एकीकडे अशी परिस्थिती असताना, दुसरीकडे आज राज्यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मालमत्तांवर सीबीआयने छापेमारी केली, तसेच त्यांच्यावर एफआयआर दाखल केली.
यावरून आज राज्याच्या राजकीय वर्तुळमध्ये खळबळ उडाली. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यात बैठक झाली असून, अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेली कारवाई म्हणजे पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप सत्ताधारी नेत्यांकडून करण्यात येत आहे.
तसेच, देशात आणि राज्यात महामारीची स्थिती हाताबाहेर गेली असून, या अचानक केलेल्या कारवाईने, आम्ही लावून धरलेल्या विषयावरून जनतेचे लक्ष वळवण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे, तर राष्ट्रवादीकडूनही केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे.
देशात साधा प्राणवायूचा अखंड पुरवठा करण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे, तसेच ऑक्सिजनभावी रुग्णांचे मृत्यू होत आहेत. ना ऑक्सिजन, ना रेमेडीसीवर, ना लस. हे अपयश झाकण्यासाठीया आणि यावरून माध्यमांचं लक्ष विचलित करण्यासाठी केंद्राकडून ही जुनीच सीबीआयची खेळी करण्यात आल्याचा हल्लाबोल, ट्विट करत राष्ट्रवादीने केला आहे.
साधा प्राणवायू पुरवण्यात केंद्र सरकारला अपयश आलंय. देशभर ऑक्सिजनअभावी रुग्ण मृत्यूच्या दारात आहेत. राजधानीत २४ तासांत ३० रुग्णांचा मृत्यू झाला. ना ऑक्सिजन, ना रेमडिसिवीर ना लस. हे अपयश झाकत माध्यमांचं लक्ष विचलित करण्याची केंद्र सरकारची ही जुनीच #CBI खेळी.
— NCP (@NCPspeaks) April 24, 2021