अहमदनगर: महाराष्ट्रात सध्या कोरोना महामारीने मोठ्या प्रमाणावर थैमान घातले आहे. ऑक्सिजनचा तुटवडा,रुग्णालयांमध्ये असणाऱ्या बेड्स ची कमतरता आणि लसींचा तुटवडा यांमुळे महाराष्ट्र सध्या संकटात सापडला आहे. ऑक्सिजन च्या तुटवड्यावरून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर राजकारण झाले. यावरुन राज्य सरकारमधील मंत्र्यांकडून केंद्रावर दुजाभावाचा आरोप करण्यात येत आहे. आता या आरोपांना भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे . आपण काय बोलतोय याचं भान आघाडीतील मंत्र्यांनी ठेवायला हवं असं भाजपाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे . लसीकरणात पंतप्रधानांनी भेदभाव केल्याचा आरोप करणारे महाराष्ट्रात सर्वात जास्त लसीकरण झाल्याने स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत याचे आश्चर्य वाटतेय.
लसीकरणासाठी पंतप्रधानांनी पुढाकार घेतला आहे आणि राज्य सरकार , केंद्र सरकारचा लसीकरणात दुजाभाव करत असल्याचा आरोप करत आहे . दुसरीकडे देशात सर्वात जास्त लसीकरण महाराष्ट्रात झाल्याने सरकार पाठ थोपटून घेत आहे . मग केंद्राच्या मदतीशिवाय लसीकरण झाले का ? असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे .किमान आपण केलेल्या घोषणांची अंमलबजावणी होते की नाही हे मुख्यमंत्र्यांनी बघावं महाराष्ट्राने १ मे पासून मोफत लसीकरणाचा पुढाकार घेतलाय या निर्णयाचे स्वागतच आहे.
राज्य सरकारने लॉकडाऊन आणखी वाढवलाय. मात्र लॉकडाऊनच्या अगोदर केलेल्या घोषणांचे काय? किती अंमलबजावणी झालीय? अजून लोकांची उपासमार सुरू आहे. किमान आपण केलेल्या घोषणांची अंमलबजावणी होते की नाही हे मुख्यमंत्र्यांनी बघावं असंही राधाकृष्ण विखे यांनी म्हटलं आहे. अहमदनगर जिल्ह्यात कोरोनासाठी सुविधा द्या यासाठी मंत्री पत्र लिहतात हे आश्चर्य आहे. मंत्र्यांचे काम होतं सुविधा करण्याचं, कोरोनाचे आज सुरू झालेले संकट नाहीये. एक वर्षानंतर मंत्र्यांना जिल्ह्यात सुविधांचा अभाव असल्याचं कळलंय. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहणे हा फक्त फार्स असून आपली अब्रू आणि अपयश झाकण्याचा हा प्रकार असल्याची टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर केली आहे.